मुंबई : शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र तसेच राज्य सरकारकडून अनेक योजना राबविल्या जात आहे. यातच ज्या शेतकर्यांकडे स्वतःची जमीन नाही, किंवा जे शेतकरी अल्पभूधारक आहेत अश्या शेतकर्यांसाठी राज्य सरकारकडून शेतजमीन खरेदी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना 2022 असे या योजनेचे नाव असून ही योजना राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील व्यक्तींना जमिनीची खरेदी करून रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून सुरु करण्यात आली. तर चला जाणून घेऊयात.. अर्जाच्या अटी, पात्रता, लाभ,कागदपत्रे अर्ज कुठे करावा या सर्व गोष्टींची माहिती.
या योजनेनुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील अल्पभूधारक शेतकर्यांना राज्यशासनाकडून जमिन खरेदी करण्यासाठी 50 टक्के बिनव्याजी कर्ज स्वरूपात व 50 टक्के अनुदान स्वरूपात रक्कम दिली जाते. या योजनेअंतर्गत अल्पभूधारक शेतकरी, भुमीहीन शेतमजूर यांच्यासाठी शासनाकडून शेतजमीन खरेदी करून ती भूमिहीन अनुसूचित जाती प्रवर्गातील कुटुंबांतील पती अथवा पत्नीच्या नावे केली जाते. लाभार्थी विधवा किंवा परितक्त्या स्त्री असेल तर जमीन त्यांच्या नावे केली जाते. चार एकर कोरडवाहू किंवा दोन एकर बागायती जमीन या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाते.
भूमिहीन योजनेच्या अटी –
लाभार्थी हा भूमिहीन दारिद्र्यरेषेखालील शेतमजूर असावा.
योजनेच्या लाभासाठी अर्जदाराचे वय कमीत कमी १८ व जास्तीती जात वय ६० वर्षे निश्चित केले आहे.
विधवा किंवा परित्यक्ता स्त्रीयांना योजनेतील लाभासाठी प्राधान्य देण्यात आलेले आहे.
जमीन खरेदी करताना तीन लाख रूपये प्रती एकरी एवढ्या कमीत कमी मर्यादेपर्यंत चर्चेद्वारे जमीन खरेदी करण्याची मुभा जिल्हास्तरीय समितीस देण्यात आलेली आहे.
या योजनेअंतर्गत यापूर्वी लाभ घेतलेल्या संबंधित कुटुंबाला कोणत्याही कारणास्तव जमीन अन्य कोणत्याही व्यक्तीला हस्तांतरीत करता येत नाही किंवा विकता येत नाही.
महसूल व वन विभागाने ज्यांना गायरान व सिलिंगच्या जमिनीचे वाटप केले आहे, अश्या कुटुंबांना योजनेचा लाभ देण्यात येणार नाही.
या योजनेअंतर्गत लाभ घेऊन जमीन मिळवलेल्या लाभधारकाने जमीन स्वत: कसणे गरजेचे असून तसा करारनामा करून देणे बंधनकारक असणार आहे.
या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबाला देण्यात येणारे कर्ज हे बिनव्याजी १० वर्षे मुदतीसाठी असणार आहे.
कर्जफेडीची सुरूवात कर्ज मंजुरीनंतर २ वर्षांनंतर सुरू होणार आहे.
कुटूंबाने विहीत मुदतीत म्हणजेच कर्ज घेतल्यापासून १० वर्ष्यात कर्जाची परतफेड करणे आवश्यक आहे.
अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे –
अर्ज विहीत नमुन्यात पासपोर्ट फोटोसह भरावा.
अर्जदाराने अनुसूचित जाती प्रवर्गातील असल्याबाबतचे जातीचे प्रमाणपत्र
रहिवाशी दाखला
रेशन कार्ड झेरॉक्स,
आधार कार्ड झेरॉक्स,
निवडणूक कार्ड प्रत
भूमिहीन शेतमजूर असल्याबाबत तहसीलदार दाखला
मागील वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा तहसीलदार यांचा दाखला.
वय ६० वर्षांखालील असल्याचा वयाचा दाखला किंवा पुरावा.
लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असल्याबाबत विहीत प्रमाणपत्र.
शेतजमीन पसंतीबाबत लाभार्थ्यांचा १०० रूपयांच्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञापत्र.
अर्ज कुठे करावा –
वरील सर्व अटी व पात्रता लाभ घेण्यास पात्र असल्यास संबंधित जिल्याच्या सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात अर्ज सादर करावा.