जळगाव – जळगाव व धरणगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ताब्यातील ज्या 52 रस्त्यांचा दर्जोन्नत झाला आहे. अशा रस्त्यांचे हस्तांतरण तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करावे. असे निर्देश राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या सार्वजनिक बांधकाम विभागास दिलेत.
जळगाव ग्रामीण मतदार संघातील विविध कामांची आढावा बैठक येथील अजिंठा शासकीय विश्रामगृहात ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, जिल्हा नियेाजन अधिकारी प्रतापराव पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबीता कमलापूरकर, श्री. महावितरणचे श्री. शेख, तहसीलदार श्रीमती देवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री. राऊत, पंचायत समिती सदस्य मुकुंद ननावरे, गुलाब वाघ, यांचेसह विविध विभागांचे अधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, विविध गावांचे सरपंच उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ना. पाटील म्हणाले की, जळगाव व धरणगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये प्लेव्हरब्लॉक, गावातंर्गत रस्तयांचे कॉक्रीटीकरण, सामाजिक सभागृह, अभ्यासिकांची जी कामे मंजूर आहेत. ती तातडीने पूर्ण करावीत. तसेच जळगाव तालुक्यातील 77 व धरणगाव तालुक्यातील 49 गावांमध्ये नव्याने सुचविण्यात आलेल्या कामांच्या निविदा पूर्ण करुन ती कामे सुरु करावीत. ज्या रस्त्यांचा दर्जोन्नत झाला आहे ते रस्ते तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत करावेत. जेणेकरुन त्या रस्त्यांच्या कामांचे प्रस्ताव तयार करता येईल. यावेळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना व हायब्रीड ॲन्युयिटी अतंर्गत सुरु असलेल्या कामांचाही आढावा घेण्यात आला.
त्याचबरोबर चांदसर, पिंपळे, शिरसोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांची दुरुस्ती करणे, तसेच पावळी परिस्थिती लक्षात घेऊन जेथे वैद्यकीय अधिकारी नाहीत तेथे तातडीने वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करुन देणे. ग्रामपंचायत कार्यालयांची 57 कामे सुरु आहे. ती लवकरात लवकर पूर्ण करावीत. धरणगाव तालुक्यातील गा्रमपंचायतीकडे 14 व्या वित्त आयोगाचा 14 कोटी तर जळगाव तालुक्यातील गा्रमपंचायतींकडे 22 कोटी निधी उपलब्ध आहे. तेथे ग्रामसेवकांअभावी विकासाची कामे सुरु करता येत नसल्यामुळे तेथे ग्रामसेवक उपलब्ध करुन देण्याचे आदेश ना. पाटील यांनी यावेळी दिले. त्याचप्रमाणे अद्यापपर्यंत अनेक शेतकऱ्यांना बोंडअळी व दुष्काळाचे अनुदान मिळालेले नाही. त्या शेतकऱ्यांना तातडीने अनुदान उपलब्ध करुन देण्याच्या सूचनाही सहकार राज्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्यात. यावेळी ना. पाटील यांनी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत मतदार संघात सुरु असलेल्या, पूर्ण झालेल्या व अपूर्ण कामांचा आढावा घेतला.