मुंबई,(प्रतिनिधी)- ‘ग्रामसेवक’ या पदभरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांसाठी मोठी बातमी असून जिल्हा परिषद ग्रामविकास विभाग अंतर्गत राज्यात तब्बल १० हजार पदांसाठी भरती करण्याबाबत सरकारने निर्णय घेतला असून याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.राज्यातील ग्रामपंचायतींचा कारभार हाकण्यासाठी ‘ग्रामसेवकांची’ संख्या कमी पडत असतांना शासनाने १० हजार ग्रामसेवक पदभरती जाहीर केल्याने राज्याच्या ग्रामपंचायत कारभार गतिमान करण्यासाठी चालना मिळणार आहे.दरम्यान शासनाने ग्रामसेवक परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.
राज्याचा ग्रामविकास विभाग सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरणार असून सदर मान्यता ही वित्त विभागाच्या निर्देशानुसार दि. १५ ऑगस्ट, २०२३ पर्यंत लागू राहणार आहे त्यापुढील भरती प्रक्रिया वित्त विभागाचा शासन निर्णय दि. ३० सप्टेंबर, २०२२ नुसार सुधारित आकृतिबंध शासनाने मान्य केल्यावरच करता येणार आहे.
जिल्हा निवड मंडळामार्फत परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाणून घ्या….
पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध : १ ते ७ फेब्रुवारी २०२३
अर्ज मागवण्याची शेवटची तारीख : २२ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतील.
२३ फेब्रुवारी ते १ मार्च २०२३ : या कालावधीत अर्जाची छाननी
२ ते ५ मार्च २०२३ : पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार
६ ते १३ एप्रिल २०२३ : पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र उपलब्ध करुन देण्यात येणार
१४ ते ३० एप्रिल २०२३ : या कालावधीत ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून परीक्षेचे आयोजन
१ मे ते ३१ मे २०२३ : या कालावधीत अंतिम निकाल आणि पात्र उमेदवारांना नियुक्तीचे आदेश दिले जाणार
या वेळापत्रकाचे सर्व जिल्हा परिषदांना पालन करावे लागणार आहे. त्याकरिता रिक्त पदे (एकूण रिक्त पदांच्या ८०% मर्यादेपर्यंत), त्यांची आरक्षण निश्चिती, उमेदवारी अर्ज मागविणे, सदर परीक्षेच्या आयोजनासाठी कंपनी निवडणे (आवश्यक असल्यास), परीक्षा घेण्यासंबंधीची सर्व जबाबदारी ही जिल्हा निवड मंडळाची व जिल्हा परिषदेची असेल.अधिकृत वेबसाईट – www.maharashtra.gov.in आहे.