जळगाव : जळगाव शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका तरुणाने एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जाऊन उडी घेत आत्महत्या केली आहे. कांतीलाल मोहन पवार (२८) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. मी जरा दुकानावरून जाऊन येतो असे सांगून हा तरुण घराबाहेर पडला होता. मात्र तो नंतर घरी परतलाच नाही. घडलेला प्रकार समजल्यावर तरुणाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.
नेमकी काय आहे घटना?
जळगाव शहरातील समता नगरात कांतीलाल हा आई, पत्नी व तीन वर्षाचा मुलगा यांच्यासह वास्तव्याला होता. हातमजुरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी दुपारी चार वाजता कांतीलाल याने आईला मी दुकानावर जाऊन येतो असे सांगितले आणि याच दरम्यान बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. कांतीलालचे आत्महत्या करण्याचे कारण समजू शकलेले नाही. एकुलता एक भाऊ गेल्याने बहिणीने रुग्णालयात प्रचंड आक्रोश केला होता.
घटनेची माहिती मिळाल्यावर रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह जिल्हा व शासकीय रुग्णालय हलवला. या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नितीन विस्पुते यांनी तरुणास मयत घोषित केले. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले.
कांतीलाल याच्या पश्चात आई उषाबाई, पत्नी राणी, मुलगा जयेश (३) आणि तीन बहिणी असा परिवार आहे. याबाबत रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आले आहे.