अमळनेर : बंद वीज मिटर बदलण्यासाठी विद्युत अभियंत्यांच्या सांगण्यावरून पाच हजार रुपयांची लाच मागणाऱ्या वायरमनला धुळे विभागाच्या लाचलुचपत विभागाने पकडून अटक केली आहे.
अमळनेर तालुका शिवसेनाप्रमुख श्रीकांत अनिल पाटील यांच्या राहत्या घराचे वीजमीटर पाच महिन्यांपासून बंद होते. त्यांना सरासरी बिल येऊन ते नियमित भरत होते. दहा दिवसांपूर्वी कनिष्ठ अभियंता वैभव देशमुख हे पाटील यांच्या घरी वीजमीटरची पाहणी करून गेले होते. त्यानंतर वायरमन भरत पाटील यांनी सांगितले, की मीटर बंद आहे. ते बदलावे लागेल. अभियंता देशमुख यांच्या सांगण्यावरून त्यांनी १० हजार रुपये द्यावे लागतील, अन्यथा तुम्हाला दंड लागेल, असे सांगितले.
अन् रंगेहाथ पकडले
यावरून पाटील यांनी सोमवारी (ता. ५) लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यावरून लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक अनिल बडगुजर यांनी पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे यांनी पथकाला पडताळणीसाठी पाठविले. भरत पाटील यांनी तडजोडीअंती पाच हजारांची रक्कम स्वीकारली. भरत पाटील याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.