मुंबई : शेतकऱ्याच्या चिंतेत भर टाकणारी एक बातमी आहे. बंगालच्या खाडी भागात दक्षिण पूर्व आणि अंदमानच्या समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशातील काही भागात मुसळधार ते अतिमुळधार पावसाची शक्यता आहे.
मागील काही दिवसांपासून देशातील तापमानात कमालीचे बदल होत आहे. कधी थंडीचा कडाका तर कधी उन्हाच्या झळा सहन करावा लागत आहे. डिसेंबर महिना सुरू झाला असला तरी राज्यात म्हणावी तशी थंडी पडलेली नाही. त्यामुळे रब्बी पिकांचं काय होणार या चिंतेत शेतकरी आहे. अशातच ऐन हिवाळ्यात पुन्हा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे.
हवामान खात्याने देशाच्या बहुतांश भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाच्या या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांना धडकी भरली आहे. हवामान विभागाने जारी केलेल्या अंदाजानुसार येत्या ८ डिसेंबरला पुद्दुचेरी आणि तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस पडेल. आएमडीनं दिलेल्या माहितीनुसार यावेळी पावसासोबतच सोसाट्याचे वारेही वाहणार आहेत.
हवामान तज्ज्ञांनुसार 5 डिसेंबरपर्यंत दक्षिण पूर्वेला असणारी बंगालची खाडी आणि त्यालाच लागून असणाऱ्या अंदमानच्या समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊ शकतो. 7 डिसेंबरपर्यंत हा पट्टा आणखी सक्रीय होणार असून, पश्चिम आणि उत्तर पश्चिमेच्या दिशेनं पुढे जाईल. परिणामी तामिळनाडूमध्ये पावसाची जोरदार हजेरी दिसणार आहे.
देशात थंडीचा कडाका वाढणार
दरम्यान, एकीकडे देशाच्या एका टोकाला पावसाची चिन्हं असतानाच दुसरीकडे उत्तरेला असणाऱ्या राज्यांमध्ये थंडीचा कडाका वाढतानाच दिसत आहे. काश्मीर, हिमाचल प्रदेश यांसारख्या भागांमधल बहुतांश ठिकाणांवर बर्फवृष्टी होताना दिसत आहे. याचे थेट परिणाम देशातील काही भागांवरही दिसून येत आहे. पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्लीसह इतरही भागांमध्ये थंडीचा कडाका वाढणार आहे.