मुंबई : एखादे जुने घर किंवा दुकान खरेदी केल्यानंतर त्याचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून नव्या मालकाच्या नावावर होण्यासाठीची ग्राहकांची धावपळ आता बंद होणार आहे. कनेक्शन आपोआपच नवीन घर मालकाच्या नावावर होणार आहे. यासाठी महावितरणने ईज ऑफ लिव्हिंग हा उपक्रम सुरू केला आहे. त्याची महावितरणने ऑक्टोबर महिन्यात चाचणी घेतली होती. ती यशस्वी झाल्याने आता हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे.
एखाद्याने जुने घर किंवा दुकान खरेदी केले आणि त्यानुसार मुद्रांक शुल्क भरून संबंधित विभागाकडे नोंदणी केली की त्यानंतर त्या घराचे किंवा दुकानाचे विजेचे कनेक्शन जुन्या मालकाकडून आपल्या नावावर होण्यासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागत होता. मात्र आता महावितरणने मुद्रांक नोंदणी विभागाशी समन्वय साधत ऑनलाइन यंत्रणा विकसित करून घेतली आहे, त्यामुळे जुने कनेक्शन आपोआप नावात बदल होत नव्या मालकांच्या नावावर होणार आहे. महावितरणने माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून ही नवी व्यवस्था विकसित केली आहे.
ग्राहकांची धावपळ बंद होणार
या बदलासाठी महावितरणकडे अर्ज व सोबत कागदपत्रे दाखल करून प्रक्रिया शुल्क भरल्यानंतर कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून पडताळणी केली जात असे. महावितरणने यासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध केली आहे. त्यानुसार ऑनलाईन अर्ज भरून संबंधित कागदपत्रे अपलोड करता येतात. परंतु, या प्रक्रियेत कागदपत्रांच्या पडताळणीत वेळ जात होता. ग्राहकांना अनेकदा पाठपुरावा करावा लागत होता.
अशी आहे नवीन यंत्रणा
नव्या व्यवस्थेनुसार मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाशी महावितरणची आयटी सिस्टिम जोडण्यात आली आहे. नोंदणी विभागात नव्या मालकाच्या नावाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर महावितरणला याबाबत मेसेज येतो. त्यानुसार महावितरणकडून संबंधित ग्राहकाला एसएमएस पाठविला जातो. त्यानंतर आवश्यक प्रक्रिया शुल्क भरण्याबाबत सांगितले जाते. हे शुल्क नागरिक आता घरात बसून देखील ऑनलाइनही भरू शकतो. फी भरल्यानंतर विजेचे कनेक्शन नावावर होते आणि पुढच्या महिन्याचे विजेचे बिल नवीन मालकाच्या नावाने पाठविले जाते. एकापेक्षा अधिक व्यक्तींच्या नावे घराची खरेदी झाली असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून कोणाच्या नावे वीज कनेक्शन ट्रान्सफर करायचे याची देखील निवड करण्यास सांगितले जाते.