धरणगाव – ज्या मातीत जन्मलो ती माती आणि ज्या नात्यात वाढलो ती नाती कधीही विसरायची नसतात. याच उक्तीचा प्रत्यय कल्याणेहोळ (ता.धरणगाव) या लहानशा खेडेगावात सोमवारी आला. अडीच हजार लोकवस्तीच्या या गावातील प्राथमिक शाळा कात टाकतेय. या शाळेचे स्वरूप आता डिजिटल झाले आहे. याचे निमित्त ठरलेत या गावातील सुशिक्षित तरुण आणि ग्रामस्थ. जयदीप पाटील या तरुणाने दोन वर्षांपूर्वी येथे विज्ञानगाव चळवळ रुजवली. विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे दिले. मात्र, गावातील शाळा तंत्रज्ञानाच्या पातळीवर अद्ययावत नव्हती म्हणून नोबेल फाउंडेशनने संगणक व शैक्षणिक सॉफ्टवेअर भेट देत ही अडचण सोडवली. तर महाराष्ट्र यूथ फाउंडेशनने एलईडी टीव्ही संच भेट दिला.
सोमवारी गटविकास अधिकारी स्नेहा कुलचे पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळेतील शिक्षकांना हे संच भेट देण्यात आले. लोकनियुक्त सरपंच रमेश पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच गडचिरोली येथील ‘सर्च’ प्रकल्पाच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ.ऋचा शेटे, लंडन येथील डॉ.संग्राम पाटील, गटशिक्षणाधिकारी बाविस्कर, अमळनेर येथील सामाजिक कार्यकर्ते नीरज अग्रवाल, महाराष्ट्र यूथ फाउंडेशनचे अध्यक्ष अक्षय कोठावदे, प्रा.धर्मसिंह पाटील, स्वयंदीप प्रतिष्ठानचे संदीप पाटील, नोबेल फाउंडेशनचे विशाल पाटील, सावली फाउंडेशनचे पवन पाटील उपस्थित होते. सीए नीरज अग्रवाल, गटशिक्षणाधिकारी बाविस्कर, सरपंच रमेश पाटील, अक्षय कोठावदे यांनी मनोगतातून शिक्षण व तंत्रज्ञानाचेे महत्त्व पटवून दिले. मुख्याध्यापिका अपर्णा पाटील यांनी शाळेत राबवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आभार शिक्षिका संगीता कोळेकर यांनी मानले. विद्यार्थी आणि पालकांची उपस्थिती होती. या पुढाकारामुळे कल्याणेहोळ येथील जिल्हा परिषद शाळा डीजिटल होऊन विद्यार्थ्यांना आधुनिक पद्धतीने शिक्षण घेणे शक्य होणार आहे.