पाचोरा – अवकाळी पावसाने खरीप पिके पूर्णपणे मातीमोल झाली. अशा स्थितीत कोरडवाहू शेतीला हेक्टरी ८ हजार आणि फळबागांसाठी १८ हजारांची तुटपुंजी भरपाई देणे म्हणजेच थट्टा असल्याचा आक्रोश शेतकऱ्यांनी पाचोऱ्यातील मोर्चात व्यक्त केला. शेतकऱ्यांची खरोखर काळजी असेल तर कोरडवाहूला २५ हजार, फळबागांसाठी हेक्टरी ५० हजारांचे अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी अमोल शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बाजार समितीचे सभापती सतीश शिंदे, उपसभापती अॅड. विश्वासराव भोसले, संचालक नरेंद्र पाटील, दिलीप पाटील, कल्पेश संघवी, धोंडू हटकर, माजी संचालक मच्छिंद्र पाटील, राजेंद्र पाटील, नगरसेवक मनीष भोसले, विष्णू अहिरे, माजी सभापती रवींद्र पाटील, अॅड.अनुराग काटकर, रफीक बागवान, लतिफ खान, नीरज मुणोत, प्रफुल्ल संघवी, आनंद संघवी, सिद्धार्थ पाटील उपस्थित होते.
आमदारांवर टीका, आंदोलन तीव्र करणार : शिंदे
प्रांत कार्यालयाच्या प्रांगणात शेतकऱ्यांशी संवाद साधताना अमोल शिंदे यांनी शिवसेनेच्या आमदारांना शेतकऱ्यांविषयी आस्था नाही. ते मुंबईच्या हाॅटेलात पाहुणचार घेण्यात व्यस्त आहे. मात्र, आम्ही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आंदोलन तीव्र करू, असे सांगितले.