- राष्ट्रपती राजवटीमुळे पंतप्रधानांनी हस्तक्षेप करणे गरजेचे – पवार
- पवारांची भेट घेतल्यानंतर मोदींनी गृहमंत्री अमित शहांशी केली चर्चा
नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेस प्रमुख शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी भेट घेतली. या भेटीकडे सर्वसामान्य नागरिकांसह सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष वेधले होते. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, पवारांनी मोदींना एक पत्र सोपविले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली आहे. सोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने यावर उपाययोजना करावी असे आवाहनही करण्यात आले आहे.
राष्ट्रपती राजवटीमुळे पंतप्रधानांनी हस्तक्षेप करणे गरजेचे – पवार
वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कैफियत मांडली. पवारांनी आपण राज्यातील दोन जिल्ह्यांचा दौरा करून पाहणी केली. परंतु, मराठवाडा आणि विदर्भासह राज्यभर शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट आहे. त्यासंदर्भातील संपूर्ण आकडेवारी सध्या गोळा केली जात असून लवकरच आपल्यासमोर मांडली जाईल असे पवार म्हणाले. महाराष्ट्रात सध्या राष्ट्रपती राजवट लागू आहे. अशात शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन तातडीने लक्ष घालणे अतिशय महत्वाचे आहे. आपण तातडीने यासाठी उपाय आणि मदत केल्यास आपला आभारी राहील असे पवारांनी म्हटले आहे.
पवारांच्या भेटीनंतर पंतप्रधानांची अमित शहांसोबत चर्चा
शरद पवार यांची भेट घेत असताना पंतप्रधानांनी केंद्रीय अर्थमंत्र्यांशी चर्चा केली होती. तसेच पवारांची भेट घेतल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना बोलावून घेतले. उल्लेखनीय बाब म्हणजे, केंद्राकडून आपातकालीन मदत जाहीर करण्याचे अधिक केंद्रीय गृहमंत्रालयाकडे असतात. त्यामुळेच पवारांची भेट घेतल्यानंतर पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन चर्चा केली. यानंतर पुढील रुपरेषा ठरवली जाणार आहे.