बुलढाणा : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दरम्यान बुलढाणा जिल्ह्यात आयोजित सभेत एक अनपेक्षित आणि खूप विचित्र घटना घडली. यावेळी शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या 735 शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहिली जात होती. पण त्याचवेळी सभेस्थळी अज्ञातांनी फटाके फोडले. त्यामुळे राहुल गांधी रागावले. त्यांनी या घटनेचा निषेध केला. तसेच पोलिसांकडे फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली.
राहुल गांधी यांचं भाषण सुरु होताच संबंधित प्रकार घडला. राहुल गांधी शहीद शेतकऱ्यांप्रती शोक व्यक्त करत असताना अचानक सभेच्या बाहेर जोरजोराच्या आवाजात फटाके फोडण्यात आले. त्यामुळे राहुल गांधी रागावले. त्यांनी संबंधित घटनेवर नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी आणि आयोजकांनी संबंधित प्रकारावर निषेध व्यक्त केला.
“आज ज्यांनी हे केलंय त्यांनी हिंदुस्थानमधील 735 शेतकऱ्यांनाचा अपमान केलाय”, असं राहुल गांधी यावेळी म्हणाले. शेतकरी कायदा रद्द करण्यासाठी झालेल्या आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहत असताना कोणीतरी जाणूनबुजून फटाके लावले, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.
राहुल गांधी यांनी यावेळी आपलं भाषण थोडक्यात उरकलं. आयोजकांनी अचानक फटाके वाजवलेल्यांचा निषेध व्यक्त केला. सुरक्षेच्या कारणास्तव संबंधित कार्यक्रम उरकवण्यात आला.