जळगाव : शिंदे गटातील नेते व राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील हे आपल्या प्रखर भाषेने नेहमी चर्चेत असतात. दरम्यान, त्यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. विरोधकांकडून सातत्याने माझ्यावर कुरघोड्या केल्या जातात. मात्र मी शांततेने काम करणारा माणूस आहे. मी माझं पालकमंत्री पद आणि सरकार अजून कोणाला दाखवलं नाही. जर मी दाखवलं तर बरीच लफडी माझ्याकडे आहेत, असा इशारा त्यांनी यावेळी विरोधकांना दिला आहे.
उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा
धरणगाव शहरातील बसस्थानकात रात्री उशीरापर्यंत विद्यार्थीनींना बस मिळाली नाही, त्यामुळे विद्यार्थीनींना रडू कोसळले होते. यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. शेगावला कार्यक्रम असल्यामुळे सर्व बसेस बुक होत्या, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
तसेच मुंबईला आमचा तसंच उद्धव ठाकरेंचा मेळावा होता. त्यावेळीही मुली बसस्थानकात अडकून पडल्या होत्या. मात्र त्यावेळी कोणतेच आंदोलन करण्यात आले नाही. आता काँग्रेस हा त्यांचा लव्हली प्रेम करणारा पक्ष आहे. त्यांचे राजे येत आहेत, त्यांच्यासाठी बसेस गेल्या आहेत. या सगळ्यात आमच्या मुली अडकल्या. त्यामुळे आधी त्यांना समजवलं पाहिजे आणि नंतर आंदोलन केलं पाहिजे, असा टोलादेखील गुलाबराव पाटील यांनी लगावला आहे.