मुंबई / नवी दिल्ली – महाराष्ट्रात शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकार डिसेंबरपर्यंत स्थापित होणार असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी बुधवारी व्यक्त केला आहे. येत्या दोन दिवसांत यासंदर्भातील चित्र स्पष्ट होईल असेही ते पुढे म्हणाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीच्या अवघ्या काही मिनिटांपूर्वी राऊत यांनी ही माहिती दिली. महाराष्ट्रात 12 नोव्हेंबरपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, आम्ही सरकार स्थापित करण्याच्या मार्गावर आहोत. येत्या दोन दिवसांत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल आणि शिवसेनेच्या नेतृत्वातील सरकारची स्थापना येत्या डिसेंबरपर्यंत केली जाईल. यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुन्हा एकमेकांच्या भेटी घेणार का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर बोलताना या दोन्ही पक्षांच्या बैठका आता संपलेल्या आहेत. तसेच राज्यात सरकार स्थापनेबाबत चर्चेचा देखील समारोप झाला असे राउत म्हणाले. राज्यात 24 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवणडुकीचे निकाल समोर आले. परंतु, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीसह कुठलाही पक्ष अद्याप सत्ता स्थापनेचा दावा करू शकलेला नाही. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतरही राजकीय पक्षांचा सत्ता स्थापनेचा प्रयत्न सुरूच आहे.