नवी दिल्ली – महाराष्ट्रात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रस्तावित महाशिवआघाडी सरकारची संथपणे शिजत असलेली खिचडी आणि त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सत्ताचर्चेबाबत गुगली टाकून निर्माण केलेल्या संभ्रमामुळे काँग्रेस आणि शिवसेनेत प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातच, मोदी सरकार शरद पवार यांना सन २०२२ मध्ये राष्ट्रपतिपदी नियुक्त करणार असल्याच्या आवईची भर पडली असून, महाराष्ट्रात राष्ट्रवादीने सरकार स्थापनेसाठी भाजपसोबत हातमिळवणी करावी म्हणून शरद पवार यांच्यावर पक्षाचे दिल्लीतील दोन खासदार दबाव आणत असल्याचीही चर्चा मंगळवारी सुरू होती.
सोमवारी सायंकाळी सोनिया गांधी यांच्याशी प्रस्तावित महाशिवआघाडी सरकारच्या स्थापनेविषयी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषदेला सामोरे गेलेले शरद पवार यांच्या विधानांमुळे काँग्रेस व शिवसेनेचे नेते आणि माध्यमेही वैतागली. अशा बैठकींनंतर सोनिया गांधी कुठलेही वक्तव्य करत नाहीत. त्यामुळे दुसरी बाजू समोर येत नाही. पण, ‘आपली सरकार स्थापनेवरून सोनिया गांधींशी चर्चा झालीच नाही’, असे अविश्वसनीय वाटणारे विधान करण्याची शरद पवार यांना आवश्यकता नव्हती. महाराष्ट्राच्या राजकारणातील ते सर्वोच्च नेते आहेत. त्यांच्या मेहनतीमुळे विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांना लक्षणीय यश मिळाले. त्यामुळे त्यांनी माध्यमांसह कुणालाही न पटणारी विधाने करून संभ्रम निर्माण करायला नको होता, अशी प्रतिक्रिया काँग्रेस आणि शिवसेनेच्या गोटात उमटली. शिवसेनेचा किल्ला लढविणारे संजय राऊत यांनाही, ‘पवार यांना समजण्यासाठी शंभर जन्म घ्यावे लागतील’, अशी टिप्पणी करावी लागली.