नवी दिल्ली-‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. राज्यातील किंवा देशातील प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कोणताही नेता त्यांना भेटू शकतो. त्यामुळं शरद पवार त्यांना भेटत असतील तर त्यात काळंबेरं शोधण्यासारखं काय आहे,’ असा प्रतिप्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज माध्यमांना केला.
महाराष्ट्रात भाजपला दूर ठेवून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीनं सरकार स्थापनेसाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे यात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. अशातच आज ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसद भवनात भेट घेणार असल्याची चर्चा आहे. ही भेट शेतकऱ्यांच्या प्रश्नावर होणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून आधीच स्पष्ट करण्यात आलं आहे. मात्र, तरीही त्याकडं राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं जात आहे. त्याबद्दलच आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना विचारण्यात आलं. मात्र, शरद पवार व मोदी यांच्या भेटीत काहीच गैर नसल्याचं त्यांनी सांगितलं.
‘सध्या संसदेचं अधिवेशन सुरू आहे. अधिवेशन काळात अनेक नेते आपापल्या राज्याचे व समाजाचे प्रश्न घेऊन पंतप्रधानांना भेटत असतात. त्याचप्रमाणे शरद पवार भेटणार आहेत. महाराष्ट्रातील अवकाळी पावसाच्या मुद्द्यावर ते मोदींची भेट घेणार आहेत. शरद पवार हे कृषी क्षेत्रातील जाणकार आहेत. त्यांनी पंतप्रधानांना भेटून राज्यातील परिस्थितीची माहिती द्यावी, असं आम्हालाही वाटत होतं. शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत मिळावी, हाच आमचाही प्रयत्न आहे,’ असं ते म्हणाले.