मुंबई : रेल्वे मंत्रालयाने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय. रेल्वे मंत्रालयाने ऑनलाईन अॅपमार्फत तिकीट बूकिंगसाठी असलेल्या नियमांत बदल केला आहे. यात अनारक्षित तिकीट मिळवण्यासाठीचे अंतर वाढवले आहे. आता पर्यंत असे तिकीट मिळवण्यासाठी २ किमी एवढे अंतर होते. मात्र आता हे अंतर वाढवून २० किमी केले आहे. प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
प्रवास करताना रेल्वे तिकीट घराजवळ नेहमी गर्दी असते. या गर्दीतून तिकीट मिळे पर्यंत आपल्याला हवी असलेली ट्रेन देखील निघून जाते. याने अनेक व्यक्तींची महत्वाची कामे रखडतात. कॉलेज, ऑफिस, परीक्षा अशा ठिकाणी नेहमीच वेळेत पोहचावे लागते. मात्र तिकीट काउंटरवर गर्दी असल्याने अनेकांचे नुकसानही झाले आहे. त्यामुळे UTS अॅपची सुविधा सुरू करण्यात आली. मात्र यात अंतर कमी असल्याने प्रवाशांना याचा तितकासा फायदा होत नाही.
रेल्वेने केलेल्या बदलानुसार यूटीएस अॅप द्वारे उपनगर नसलेल्या भागातील व्यक्ती २० किमी अंतरावरून तिकीटबुक करू शकतात. तसेच उपनगरीय भागातील व्यक्ती स्टेशनपासून ५ किमी अंतरापर्यंत तिकीट बुक करू शकतात. यामुळे तुम्हाला जेथून प्रवास करायचा आहे त्या स्थानकापासून तुम्ही दूर असलात तरी त्याचे तिकीट बुक करणे शक्य आहे.
असे करा अनारक्षित तिकीट बुक
यासाठी तुम्हाला तुमच्या अॅन्ड्रॉइड फोनमध्ये UTS अॅप डाउनलोड करावा लागेल.
त्यानंतर त्यात नाव, संपर्क क्रमांक अशी सर्व माहिती भरावी.
संपर्क क्रमांकावर तुम्हाला एक ओटीपी येईल.
हा ओटीपी अॅपमध्ये टाकल्यावर तुमचे लॉगइन पूर्ण होईल.
पूढे यातील सामान्य बुकींग या पर्यायावर क्लिक करा.
प्रवासाची सुरूवात आणि शेवट ज्या स्थानकावर होणार आहे त्याचे नाव निवडा.
त्यानंतर यात तुमचे नाव, कोड अशी सर्व माहिती आणि तिकीटाचा पर्याय निवडा.
तिकीटाचा पर्याय निवडल्यावर तुमचे तिकीट दिसेल.