नवी दिल्ली-माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह गांधी कुटुंबीयांच्या सुरक्षेत कपात करण्याच्या निर्णयामागे कोणताही राजकीय हेतू नाही. जे काही झालं आहे ते नियमानुसारच झालं आहे,’ असं संसदीय कार्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं.
मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल व प्रियांका यांची एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं नुकताच घेतला आहे. त्याऐवजी त्यांना सीआरपीएफची झेड सुरक्षा देण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी या मुद्द्यावरून काँग्रेसच्या सदस्यांनी सरकारला धारेवर धरले होते. तसंच, यावर खुलासा करण्याची मागणी केली होती. आज अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी देखील काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी हा मुद्दा उपस्थित केला. ‘मनमोहन सिंग हे दहा वर्षे देशाचे पंतप्रधान होते. सोनिया गांधी या इंदिरा गांधी यांच्या सून व राजीव गांधी यांच्या पत्नी आहेत. आपल्या दोन माजी पंतप्रधानांची हत्या झाली आहे. त्यामुळं सरकारनं सर्व महत्त्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यायला हवी. व्यक्तीच्या आयुष्याशी निगडीत हा प्रश्न असल्यानं सरकारनं राजकारणाच्या पलीकडं जाऊन याकडं पाहण्याची गरज आहे, असं शर्मा यांनी सांगितलं. यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या कार्यकाळात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेशी कसलीही तडजोड करण्यात आली नव्हती, याची आठवणही शर्मा यांनी दिली.