जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जितेंद्र आव्हाड यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे. आता बावनकुळे यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पलटवार केला आहे.
‘देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांवर अनेक गुन्हे दाखल आहेत. जर का गुन्हे दाखल झाल्यानंतर राजीनामे घेतले जात असतील, तर प्रत्येकाचा राजीनामा मागायचा का? जितेंद्र आव्हाड यांच्यावर जाणीवपूर्वक गुन्हे दाखल केले जात असल्याचं चित्र आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
‘या सरकारने आपल्या मंत्र्यांना ट्रेनिंग दिलं आहे. आपण आक्षेपार्ह वक्तव्यासह वर्तनही करा, तुमच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही. आतापर्यंत अनेक नेते आणि मंत्र्यांनी आक्षेपार्ह वर्तन केले, मात्र एकावरही अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही, पण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी अनावधानाने का होईना, असे वक्तव्य केले, तर मात्र हे सरकार सत्तेचा दुरुपयोग करत आहे. या महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही दुरुपयोग झालेला नाही, मात्र आता हे सरकार सत्तेचा दुरुपयोग करताना दिसत आहे’, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.