नवी दिल्ली- जम्मू-काश्मीरमध्ये सर्व काही सुरळीत असेल तर इंटरनेट का सुरू होत नाही? ते कधी सुरू होणार?, अशा प्रश्नांनी सरकारला कोंडीत पकडणाऱ्या विरोधकांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज उत्तर दिलं. ‘जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सुरळीत आहे. मात्र, काही निर्णय घेताना सुरक्षेचा मुद्दा ध्यानात घ्यावा लागतो. काश्मीरमध्ये पाकच्या कारवाया अजूनही सुरू आहेत,’ असं सांगतानाच, ‘इंटरनेट जास्त महत्त्वाचे आहे की सुरक्षा?,’ असा प्रतिप्रश्न शहा यांनी विरोधकांना केला.
कलम ३७० रद्द केल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये शाळा-महाविद्यालये अद्याप सुरू झालेली नाहीत. इंटरनेट बंद आहे. मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. हे सगळं कधी सुरळीत होणार असा प्रश्न गुलाम नबी आझाद यांनी उपस्थित केला होता. परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी नेमके किती दिवस लागतील याची माहिती सरकारनं द्यावी, अशी मागणी खासदार माजिद मेमन यांनी केली. अमित शहा यांनी त्यावर सविस्तर उत्तर दिलं.
‘काश्मीरमध्ये परिस्थिती सुरळीत आहे. २०४१२ शाळा सुरू झाल्या आहेत. परीक्षा देखील पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार होत आहेत. पेट्रोल, डिझेलच्या पुरवठ्यातही १६ टक्क्यांची वाढ झाली आहे. सफरचंदाचं पीकही घेतलं जात आहे. कलम ३७० रद्द केल्यापासून राज्यात दगडफेकीच्या घटना खूपच कमी झाल्या आहेत. विशेष म्हणजे पोलिसांकडून सर्वसामान्य नागरिकांवर एकही गोळी चालवण्यात आलेली नाही,’ असं शहा यांनी सांगितलं. राज्यात औषधांचा साठा पुरेसा उपलब्ध आहे. औषधांच्या पुरवठ्यासाठी मोबाइल व्हॅन सुरू करण्यात आल्या आहेत,’ अशी माहितीही शहा यांनी दिली.