जळगाव,(प्रतिनिधी)- हवामान बदलामुळे शेती करणे अवघड होत असले तरी राज्य शासन प्रत्येक गावात हवामानाचा अंदाज देणारे यंत्र लवकरच बसवणार आहे. जेणेकरून हवामानाबाबत पूर्वसूचना मिळेल तसेच नुकसान झाल्यास गावनिहाय पिक विमा मिळण्यासही मदत होईल. अॅग्रोवर्ल्डचे कृषी प्रदर्शन म्हणजे विज्ञान व तंत्रज्ञानाची सांगड घातलेले उत्कृष्ट प्रदर्शनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
शहरातील एकलव्य क्रीडा संकुल ( एम.जे.कॉलेज कॅम्पस) अॅग्रोवर्ल्डतर्फे शुक्रवारपासून (11 नोव्हेंबर) सुरु झालेल्या कृषी प्रदर्शनात प्रयोगशील शेतकरी, शास्त्रज्ञ, महिला शेतकरी, कृषी विभागातील अधिकार्यांच्या सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. माजी आ. अँड जयप्रकाश बाविस्कर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, अँग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण, पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र चव्हाण यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रदर्शन सोमवारी (ता. 14) पर्यंत सुरू असून प्रदर्शनात 250 हून अधिक स्टॉल्स आहेत. प्रदर्शनाच्या पहिल्या दोन दिवसातच तब्बल 50 हजार शेतकऱ्यांनी भेटी दिल्या.
शेतकऱ्यांनी प्रदर्शनातून तंत्रज्ञान समजून घ्यावे
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले, की शेतकर्यांनाही आता बदलत्या काळानुसार बदलावे लागणार आहे. हवामानात होणार्या बदलांमुळे कमी कालावधीचे पीक घेत येते का याचाही विचार करणे गरजेचे झाले आहे असे सांगून अॅग्रोवर्ल्डच्या प्रदर्शनातून तंत्रज्ञानाची माहिती उपलब्ध झाल्याचे त्यांनी सांगितले.
जैन इरिगेशन सिस्टिम लिमीटेड या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून प्लॅन्टो कृषी तंत्र, श्रीराम ठिबक, के. बी. एक्स्पोर्ट, ओम गायत्री नर्सरी, निर्मल सीड्स, पूर्वा केमटेक, नमो बायोप्लांट्स, ग्रीन ड्रॉप, सिका ई- मोटर्स, आर. सी. बाफना ज्वेलर्स हे सहप्रायोजक आहेत.