मुंबई – इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रुडीकेने घेतलेल्या जेईई अॅडव्हान्स परीक्षेचे निकाल जाहीर झाले आहेत. या परीक्षेत चंद्रपूरच्या बल्लारपूर येथे राहणारा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला आला आहे. त्याला 100 पर्सेंटाइल मिळवले आहेत.
या आधीही जेईई मेन परीक्षेत 100 पर्सेंटाइल मिळवून तो देशात 18 वा आला होता. तर महाराष्ट्रात दुसरा आला होता. कार्तिकेयने यावर्षीच इयत्ता 12वीच्या परीक्षेत 93.7 टक्के गुण मिळविले आहेत.
कार्तिकेय अवघ्या 17 वर्षाचा असून त्याने जेईई अॅडव्हान्स परीक्षेत 360 पैकी 337 गुण मिळविले आहेत. कार्तिकेयचे वडील चंद्रेश गुप्ता पेपर इंडस्ट्रीमध्ये मॅनेजर असून आई पूनम गुप्ता या गृहिणी आहेत. जेईई अॅडव्हान्स परीक्षा 27 मे रोजी झाली होती. या परीक्षेला देशभरातून 2.45 लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते. या परीक्षेचा निकाल पाहण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
जेईई अॅडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल लागल्यानंतर कार्तिकेयने आनंद व्यक्त केला. निकाल चांगला लागेल हे माहीत होतं. पण देशातून पहिला येईल असं वाटलं नव्हतं, असं सांगतानाच विचारपूर्वक परीक्षेची तयारी केली आणि नियमित क्लासला जाण्याबरोबरच 6 ते 7 तासांचं शेड्यूल तयार करून अभ्यास केल्यानेच हे यश मिळाल्याचं कार्तिकेयनं सांगितलं.