भडगाव तालुक्यातील वडजी, पाढरंद, पिचर्डे, बात्सर या गावांना भेटी
जळगाव – वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू. अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गिरीश महाजन यांनी आज दिली.
दोन दिवसापूर्वी अवकाळी पावसामुळे भडगाव तालुक्यातील केळी, पपई व इतर पिकांसह शाळा, घरांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री ना. महाजन हे आज जिल्ह्याच्या दौ-यावर आले होते. आज सकाळी ११.०० वाजता त्यांनी भडगाव तालुक्यातील वडजी, पाढरंद, पिचर्डे, बात्सर या गावांना भेटी देऊन तेथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांचेसमवेत जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे, पाचोरा प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, पाचोरा तहसिलदार कैलास चावंडे, भडगाव तहसिलदार गणेश मरकड, कृषी अधिकारी बीबी गोर्डे , पंचायत सभापती रामकृष्ण पाटील, नगराध्यक्ष अतुल पाटील, भाजप तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील, वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ. संजीव पाटील, भाजयुमो जिल्हाध्यक्ष अमोल पाटील, अमोल शिंदे,मधू काटे, बन्सीलाल पाटील,सुभाष पाटील,पोनी धनंजय येरुळे , श्रावण लिंगायत, अनिल पाटील, शैलेश पाटील, यांच्यासह वडजी ,पिचर्डे आदी विविध गावातील शेतकरी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना ना. महाजन म्हणाले की, राज्याचे शासन हे नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीच्यावेळीही शासनाने शेतकऱ्यांना मदतीचे धोरण ठेवले आहे. राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खाती ४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कमेचे दुष्काळी अनुदान जमा केले आहे. मागीलवर्षी यावल व रावेर तालुक्यात केळी पिकाचे नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांनाही १५ कोटी रुपयांची मदत घोषित करण्यात आली आहे. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती मिळतातच तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश महसुल व कृषि विभागाच्या यंत्रणेना देण्यात आले होते. नुकसान झालेला कोणीही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. यासाठी नुकसानग्रस्तांचे व्यवस्थितपणे पंचनामे करुन तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देशही ना. महाजन यांनी यंत्रणेला दिलेत. झालेला नुकसानीचा अहवाल राज्य शासनास सादर केल्यानंतर जास्तीत जास्त नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री देवेंर्द फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थिती सांगून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही ना. महाजन यावेळी म्हणाले. शेतक-यांच्या पाठीशी राज्य शासन भक्कमपणे असून कोणत्याही नैसर्गिक संकटावर मात करण्यासाठी शेतक-यांना सर्वतोपरी मदत केली जाईल त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरुन जावू नये. असा दिलासा त्यांनी त्यावेळी दिली. त्याचबरोबर नैसर्गिक आपत्तीवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी ना. महाजन यांनी वादळामुळे नुकसान झालेल्या घरांची तसेच शाळेची पाहणी केली. तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याचे निर्देश यंत्रणेला दिले.४९९ शेतकऱयांचे ३५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात ३९४ केली तर ५४ हेक्टर इतर पिकांचा समावेश आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून माहिती घेतली .