मुंबई- महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्यास काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी या अद्याप तयार नाहीत, असं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुण्यात पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते सोमवारी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतील. ते शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्याबाबत सोनिया गांधींचे मन वळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. ते आजच दिल्लीत जाणार होते, मात्र, काही कारणास्तव ते उद्या दिल्लीत जातील. दुसरीकडे भाजपनंही सरकार स्थापन करण्याचे ठरवले आहे.
महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यात आता सोनिया गांधींची भूमिका महत्वाची ठरणार आहे. राज्यात सरकार स्थापन होणार की नाही, हे सोनिया गांधी काय भूमिका घेतात यावर अवलंबून आहे. शिवसेनेसोबत सरकारमध्ये सहभागी होण्यास सोनिया तयार नाहीत, असं सांगितलं जात आहे. यासंदर्भात शरद पवार हे सोनिया गांधी यांची दिल्लीत भेट घेणार आहेत. त्यांचे मन वळवण्याचा ते प्रयत्न करण्याची शक्यता आहे. ते सोमवारी किंवा मंगळवारी सोनियांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. काँग्रेसशी संबंधित सूत्रांनुसार, ‘काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी किमान समान कार्यक्रमावर शिवसेनेच्या नेत्यांशी चर्चा करणे पक्षश्रेष्ठींना फारसे रुचलेलं दिसत नाही.’ काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या महाआघाडीला अद्याप मंजुरी दिलेली नाही. अखेरचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांवर नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.