नवी दिल्ली- एअर इंडिया आणि भारत पेट्रोलियम लिमिटेड या दोन कंपन्या लवकरच विकण्यात येणार आहेत. या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीची प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात यावी असं सरकारला वाटतं, अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच ही दोन्ही कामे पूर्ण होण्याची अपेक्षा असून, या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीतून सरकारला एक लाख कोटींचा फायदा होईल, असंही त्यांनी सांगितलं.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला विशेष मुलाखत दिली. ‘एअर इंडियाच्या विक्रीची प्रक्रिया सुरू होण्याआधीच गुंतवणुकदारांमध्ये उत्साह पाहायला मिळाला,’ असं त्या म्हणाल्या. गेल्या वर्षी गुंतवणुकदारांनी एअर इंडिया कंपनी खरेदी करण्यात रस दाखवला नव्हता. त्यामुळं कंपनी विकली गेली नव्हती. विशेष म्हणजे या आर्थिक वर्षात करसंकलनात झालेली घट पाहून निर्गुंतवणूक आणि धोरणात्मक विक्रीच्या माध्यमातून महसूल गोळा करण्याचा सरकारचा विचार आहे, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी अर्थमंत्र्यांनी आर्थिक मंदीबाबत भाष्य केलं. आर्थिक मंदीचे मळभ दूर करण्यासाठी वेळेवर आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. अनेक क्षेत्र या मंदीतून सावरत आहेत. आपलं ताळेबंद सुधारा असं अनेक उद्योगांच्या मालकांना सांगण्यात आलं असून, त्यातील अनेकांनी नवी गुंतवणूक करण्याची तयारी सुरू केली आहे, असंही त्या म्हणाल्या.