मुंबई: क्रिकेट आणि राजकारणात खूप फरक आहे. क्रिकेटमध्ये चेंडू दिसतो. राजकारणात तसं होतंच असं नाही. भाजपचंही तेच झालं. त्यांना चेंडू दिसलाच नाही,’ असा शब्दांत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रत्युत्तर दिलं.
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय स्थितीवर जोरदार टोलेबाजी करताना ‘क्रिकेट आणि राजकारणात काहीही होऊ शकतं’, असं वक्तव्य भाजप नेते नितीन गडकरी यांनी गुरुवारी केलं होतं. क्रिकेटमध्ये अनेकवेळा आपला पराभव होईल असं वाटतं पण अचानक चित्र पालटतं आणि निकाल तुमच्या बाजूनं लागतो. राजकारणाचंही तसंच आहे, असं गडकरी म्हणाले होते. याबाबत आज थोरात यांना विचारलं असता त्यांनी गडकरींचं म्हणणं खोडून काढलं. ‘गडकरी आमचे मित्र आहेत. पण क्रिकेट आणि राजकारणात फरक आहे. क्रिकेटमध्ये चेंडू दिसत असतो. राजकारणात तसं होतंच असं नाही,’ असं थोरात म्हणाले.
शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सत्तास्थापनेच्या प्रयत्नांना भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी तीन अंकी नाटक असं म्हटलं होतं. त्यावरही बोलताना, ‘या तीन अंकी नाटकाचा शेवट त्यांना माहीत नाही म्हणून ते असं बोलत आहेत. लवकरच राज्यात सत्ता स्थापन होईल. जास्त वेळ थांबावं लागणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रि पदाबाबत दिल्लीच्या स्तरावर निर्णय होतील, असं त्यांनी सांगितलं.
फडणवीसांना उशीर झाला!
शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. त्यावर बोलताना थोरात म्हणाले, ‘फडणवीस खूप उशिरा राज्यपालांना भेटले. आम्ही आधीच भेटलोय. अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून विनंतीही केलीय,’ असं ते म्हणाले.