जळगाव : राज्यात झालेल्या सत्तांतर नंतर शिंदे गट आणि ठाकरे गटातील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीय. अशातच शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर निशाणा साधला आहे. वेदांत फोक्सकॉन या प्रकल्पाचे नीट नाव घेता येत नाही, ते रामदास कदम वेदांत पॉपकॉर्न अस बोलत आहेत. रामदास कदम यांची बुद्धिमत्ता काय असेल, रामदास कदम यांना कोकणातील लोक जोकर म्हणून पाहतात, यापेक्षा जास्त महत्व आम्ही त्यांना देत नाही, असा जोरदार टोला शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांना लगावला आहे.
चाळीसगाव येथे एकलव्य सेनेचा रविवारी मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी शिवसेनेचे नेते भास्कर जाधव हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमानंतर भास्कर जाधव यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्र्यांचा माईक देवेंद्र फडणवीस खेचत आहेत. पत्रकारांच्या प्रश्नांना काय उत्तर द्यायचं, हे मुख्यमंत्र्यांना गिरीश महाजन सांगत आहेत. अशाप्रकारे भाजपच्या नेत्यांकडून राज्याचे मुख्यमंत्र्यांची अवहेलना केली जात आहे. हे अत्यंत दुदैवी आणि वेदनादायी आहे, अशा शब्दात खरपूस टीका भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर केली आहे. एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या नेत्यांचं तोंड बंद करावं, असेही भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
सन २०१४ साली भाजपचे सरकार आले तेव्हापासून अनेक योजना गुजरातमध्ये गेल्या. केंद्र सरकारचा महाराष्ट्रावर काय राग आहे, हे कळत नाही. वेदान्त असो की इतर अनेक महत्वाचे उद्योग हे गुजरातकडे जात आहेत, असा आरोप भास्कर जाधव यांनी केंद्र सरकार वर केला आहे. आहे ते देण्याची दानत नाही, त्यामुळे हे राज्याला काही मोठे देतील यावर जनतेचा विश्वास नाही, अशी टीका सुद्धा भास्कर जाधव यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर केली.