आदरणीय साहेब,आज तुमचा वाढदिवस. तुम्हाला अत्यंत मन:पूर्वक शुभेच्छा! माझ्या एकट्याच्याच नव्हे, तर तुम्हाला मानणार्या राज्यातील हजारो पत्रकारांच्या शुभेच्छा! तुमची कर्तबगारी तुम्हाला यापुढे अधिक यश मिळवून देईल, असा विश्वास महाराष्ट्रातील पत्रकारांना निश्चितपणे आहे. वाढदिवस हे निमित्त आहे. या दिवशी शुभेच्छांचा वर्षाव होतोच. पण या शुभेच्छा एका दिवसापुरत्या नाहीत, 365 दिवसांकरिता आहेत.
तुम्ही आम्हा तरुण पत्रकारांचे मार्गदर्शक आहात. एकीकडे तुमच्यासारखे आदर्श नेतृत्व आणि दुसरीकडे तुमच्या कामाच्या झपाट्याने भारावलेले आम्ही सगळे पत्रकार. त्यातूनच एक शक्ती आपोआप निर्माण होत आहे. तुमचे नेतृत्व माझ्यासारख्यांना भावले, याची कारणे अतिशय वेगळी आहेत. अगदी मोकळेपणाने सांगतो. समाजाच्या आणि पत्रकारांच्या प्रश्नांसाठी स्वत:ला झोकून दिलेत. अविरत काम करण्याची तुमची धमक हे तुमचे विलक्षण सामर्थ्य आहे. मेहनत आणि जिद्द तुमच्याकडून शिकावी. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघासाठी तुम्ही किती मेहनत घेता हे आम्ही रोज पाहत आहोत. एकीकडे संघटनेची वाढ करताना तुम्ही संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन आणि श्री.अंबाबाई तालिम शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक क्रांती देखील केली.
राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील पत्रकारांचे नेतृत्व तुम्ही करत आहात आणि लवकरच देशातील पत्रकारांचे नेतृत्वही तुम्ही कराल, ही काही आता काल्पनिक गोष्ट राहिलेली नाही. संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांना मोठी शक्ती तुम्ही देत आहात. पत्रकारांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठीची तुमची तळमळ तुमच्या प्रत्येक दिवशी आम्हाला जाणवते आहे. तुम्ही स्वत:पुरते कधीच पाहिले नाही. प्रत्येक विषयात आपले पत्रकार बांधव कसे उभे राहतील, त्यांना विविध सुविधा कशा निर्माण होतील याचा विचार तुम्ही करता आणि हेच तुमचे मोठेपण भावले आहे. आज समाजात स्वत:खेरीज दुसर्याचा विचार करणारी माणसे फार कमी आहेत. स्पष्ट बोलणारी आणि निर्भीडपणे मत मांडणारी तुमच्यासारखी माणसे ही समाजाची गरज आहे. तुमच्या स्वभावामध्ये स्पष्टपणाचे एक सुंदर मिश्रण झाले आहे. कोणाला ते आवडेल, कोणाला आवडणार नाही, पण तुमच्या कोणत्याही कामात बघतो, पाहतो हे शब्द तुमच्या कोषात नाहीत. काम करायचे म्हणजे तुम्ही करून टाकता. तुमच्या स्वभावात स्वच्छता, स्पष्टता आणि पारदर्शकता जाणवणारी आहे. तुमच्यापासून माझ्यासारखी लहान माणसे जे काही शिकले, ते हेच शिकले आहे की, काम करताना स्पष्टता ठेवा. महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील पत्रकारांची बांधणी करण्याचे काम आपण करत आहात, त्यामुळे तुमची नाळ महाराष्ट्राशी जोडली गेलेली आहे. हे तुमच्या कामाच्या तडफेमुळे दिसते आहे.
राज्यातील ग्रामीण व शहरी भागात संघटनेत काम करणार्या प्रत्येक पत्रकाराला व वृत्तपत्राशी संबंधीत प्रत्येक घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी, त्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकारसंघाने नेहमीच आग्रही भूमिका घेतलेली आहे. याच माध्यमातून संघाने पत्रकार संरक्षण कायद्यासाठी दिलेल्या लढ्याला यश मिळून पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आला. तसेच पत्रकारांसाठी बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनाशासनाने जाहीर केली हे देखील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने केलेल्या पाठपुराव्याला आलेले यश असून यामागे राज्य संघटक म्हणून आपले असणारे मार्गदर्शन आणि प्रेरणा महत्वाची ठरली.
राज्यातील बहुसंख्य वृत्तपत्रांचे संपादक तसेच पत्रकार, वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात महाराष्ट ्रराज्य मराठी पत्रकारसंघाशी जोडले गेले आहेत. राज्यातील कोकण, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, नागपूर, पश्चिम महाराष्ट, गोवा, बेळगाव या भागात संघटनेन सभासदांच्या विविध प्रश्नांवर मोर्चे, आंदोलने उभारुन हा पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आणण्याच्या दृष्टीने स्वतंत्र लढा दिला. राज्य मंत्री मंडळातील डझणभर मंत्र्यांकडे या कायद्यासाठी राज्य पत्रकार संघाने पाठपुरावा केला होता. संघटनेने तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री शरदचंद्र पवार व गृहमंत्री ना. सुशिलकुमार शिंदे, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना निवेदन देऊन हा कायदा राज्य शासनास अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे हा कायदा अंमलात येणे शक्य झाले. आपल्याच पुढाकारातून सांगली, सोलापूर, कोहापूर, पुणे, मुंबई, औरंगाबाद या ठिकाणी पत्रकार भवन उभारण्यात आले आहे. याबरोबरच देशाच्या राजधानीतही पत्रकार भवन उभारले आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांनाही या सवलती मिळाव्यात अशी आपली भूमिका आहे. ग्रामीण भागासह वर्तमानपत्रातील श्रमिक पत्रकार, मुक्त पत्रकार, छायाचित्रकार यांच्या संरक्षणासाठी व लढ्यासाठी संघाने व आपण स्वत: नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे. बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या निमित्ताने या लढ्याला काहीसे यश मिळाले आहे. मात्र इतरही लाभ पत्रकारांना मिळवून देण्याचा संघटनेचा आणि आपला प्रयत्न आहे. संघाच्या वतीने दरवर्षी घेतल्या जाणार्या राज्यस्तरीय अधिवेशनात पत्रकारांच्या विविध मागण्यांसंदर्भात चर्चा करुन मागण्यांचे ठराव शासनाकडे पाठवून त्या पूर्ण होण्याच्या दृष्टीने सातत्याने पाठपुरावा केला जातो. राज्यातील पूर परिस्थिती आणि गत दोन वर्षापासून सुरु असलेली कोरोना महामारी यातही आपण आणि संघाने मदतीचा हात पुढे केला. होईल ती मदत राज्यातील पत्रकारांनी पुरविली.
पत्रकार संघाच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार यांना एक लाख रुपये रोख स्वरुप असलेला जीवनगौरव पुरस्कार आपल्याच कल्पनेतून सुरु झाला आणि अनेक मान्यवरांना आपण संघाच्या माध्यमातून सन्मानित केले.आपल्या संकल्पनेतून पत्रकार संघाने नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत राज्यभरातील पत्रकारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोफत हेल्मेट वाटप केले. आपले कार्य हे पत्रकार संघापुरते मर्यादीत नसून आपल्या सांगली येथील श्रीअंबाबाई तालीम संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. तसेच क्रीडा क्षेत्रातही आपण शासनाचा छत्रपती क्रीडा पुरस्कार मिळविला आहे. आपले हे कार्य असेच यापुढे अविरत सुरु रहावे, हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!
शब्दांकन : विश्वासराव आरोटे
राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई
‘वस्ताद’मा.संजयजी भोकरे….
महाराष्ट्रातही जागतिकी करणानंतर वृत्तपत्राबरोबरच विविध प्रकारची प्रसारमाध्यमे विकसित झाली. वृत्तपत्र व्यवसायात भांडवलदार, मोठे उद्योग समूह आल्याने शहर, जिल्हा, तालुका पातळीवर वृत्तपत्रांची संख्या वाढल्याने या क्षेत्रात काम करणार्या माध्यमकर्मींचा एक मोठा घटकच तयार झाला. लोकशाहीचा चौथा खांब म्हणून, समाजातील सर्व घटकांचे प्रश्न राजकीय व्यवस्थेसमोर मांडणार्या आणि सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी झगडणार्या माध्यम क्षेत्रालाही विविध प्रश्नांना सामोरे जावे लागते.
लघु वृत्तपत्र चालकांसह, माध्यमकर्मींना तर अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. पत्रकारांना मिळणारा तुटपुंजा पगार, नाममात्र मानधन यामुळे, बाहेरून असलेले या क्षेत्राचे आकर्षक प्रत्यक्षात काम करताना किती आर्थीक पातळीवर विदारक आहे याची जाणीव होते. त्यामुळे या माध्यम क्षेत्राचे प्रश्न सोडवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ असले पाहिजे, काम करणार्यांना न्याय-सन्मान मिळाला पाहिजे या उद्देशाने दैनिक जनप्रवास आणि सांजमहानगरी वृत्तसमुहाचे संपादक संजय भोकरे हे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबई संघटनेच्या स्थापने पासुन कार्यरत आहेत. त्यांनी शहरासह ग्रामीण भागातील पत्रकारांचे संघटन करुन एकीची वज्रमुठच तयार करत, पत्रकारांना स्वत:हाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रेरीत केले. पत्रकारांची संघटना ही सक्षम असली पाहिजे यासाठी मुंबई, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर, सांगली, अहमदनगर येथे विभागीय कार्यालयाची स्थापना करुन राज्यातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये संघटनेची स्वतंत्र कार्यालये उभी केली.
राज्यातील प्रत्येक जिल्हा, तालुका, शहरात पत्रकारांचे संघटन असणारी आणि माध्यम क्षेत्रातील सर्व घटकाला अडचणीच्या काळात मदत करणारी राज्य पत्रकार संघ एकमेव संघटना झाली. राज्यस्तरावरील दिग्गजांचे सल्लागार मंडळ निर्माण करुन संघटनेची विश्वासार्हता अधिक दृढ केली. संजय भोकरे यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर, गोविंद घोळवे, राजा माने या राज्य अध्यक्षांनी आपल्या कार्यकाळात संघटनेला सर्वदूर पोहचवून संघटनेचा दबदबा निर्माण केला. संजय भोकरे यांच्या नेतृत्वाने पत्रकारांना स्वतःच्या प्रश्नांची जाणीव करुन देत ते सोडवण्यासाठी महत्वाचे योगदान दिले. दरवर्षी संघटनेचे होणारे राज्य अधिवेशने, विभागवार आणि जिल्हा पातळीवरील मेळाव्यातून पत्रकारांच्या प्रश्नांकडे सरकारचे आणि समाजाचे लक्ष वेधले. पत्रकारीतेबरोबरच कला, क्रीडा, चित्रपट, साहित्य या क्षेत्रातील मान्यवरांनाही संघाच्या वतीने सन्मानित करुन कृतज्ञता व्यक्त केली जाते. बातमी बरोबरच समाजातील वंचित आणि उपेक्षित घटकांसाठी संघटना आपली क्षमता वापरुन मदत करण्याची भूमिका घेते. तंत्रज्ञानातील वेगाने होत असलेला बदल आणि डिजीटल मिडीयाची गरज लक्षात घेऊन संजय भोकरे यांनी संघटनेच्या विभागीय कार्यालयांमध्ये अद्यावत स्टुडीओची निर्मिती करुन संघटनेला अधिक लोकाभिमुख केले आहे. संघटना अधिक सक्षम आणि विचारांचे सहज अदान प्रदान व्हावे. राज्य आणि जिल्हा, तालुका पातळीपर्यंत सर्वांशी संपर्क रहावा यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करुन पत्रकारांमध्ये विश्वास निर्माण करत पत्रकारांचा आवाज बुलंद केला. तर संघटनेच्या माध्यमातून राज्यभरात क्षमता असलेल्या अनेक पत्रकारांचे नेतृत्व विकसित केल्याने माध्यम क्षेत्रात नेतृत्व घडवणारे वस्ताद ठरले. त्यामुळेच विधिमंडळ पत्रकारांचा प्रतिनिधी असावा यासाठी राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यासाठी संबंध राज्यातील पत्रकारांमधुन एकमेव भोकरे यांच्या नावाची मागणी झाली. राज्यपालांनी संजय भोकरे यांना विधान परिषदेवर नियुक्त केले तर पत्रकारांच्या प्रश्नांना न्याय मिळेल असा विश्वास आहे. अशा महाराष्ट्राच्या क्रीडा, पत्रकारीता क्षेत्राला समृध्द करणार्या संजय भोकरे यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!.
शब्दांकन : वसंत मुंडे,
प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ,मुंबई