मुंबई- राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने चांगले काम केले आहे. त्यामुळे तेच पर एकदा मुख्यमंत्री होतील असा विश्वास अपक्ष निवडणूक आलेले आणि भाजपला पाठिंबा दिलेले आमदार रवी राणा यांनी व्यक्त केला आहे. तसेच, सत्ता स्थापन झाल्यानंतर सेनेचे 20 ते 25 आमदार भाजपमध्ये जातील असा खळबळजनक दावाही राणा यांनी केला.
विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 10 दिवस लोटले आहेत. पण, अद्याप सत्ता स्थापनेच्या कोणत्याही हालचाली दिसत नाहीयेत. शिवसेनेने सत्तेत समान वाटप करण्याची मागणी लावून धरली आहे. त्यामुळे भाजपाकडून इतर मार्गांचा वापर केला जाण्याची शक्यता असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार रवी राणांच्या या खळबळजनक वक्तव्यानंतर चर्चाना उधाण आले आहे.