जळगाव । युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहे. जळगाव शहरातील आकाशवाणी चौकात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांनतर पाचोऱ्यात सर्वांना संबोधित करतांना त्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधला.
राज्यातील सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच. हे तात्पुरते सरकार आहे तुम्ही लिहून घ्या. हे आमदार नव्हे गद्दार आहेत. ५० खोके घेऊन ते ओक्केमध्ये जाण्याचा विचार करीत होते. मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यावर हे गद्दार टेबलावर चढून बारमध्ये नाचले तसे नाचत होते. ४० लोकांचा राजकीय जन्म आणि ओळख उद्धव ठाकरेंनी मिळवून दिली. जनतेच्या बळावर हे निवडून आले असे म्हणत शिंदे गटावर जोरदार हल्ला चढवला.
सरकार जाण्याचे मला बिलकुल दुःख नाही. सरकार येते जाते. तुम्ही पुन्हा सरकार आणणार याचा मला विश्वास आहे. जो महाराष्ट्र आपण पुढे नेत होतो तो महाराष्ट्र ते मागे आणण्याचा प्रयत्न करतील. असेही ते म्हणाले. आपल्याकडे त्यांना चांगली खाती मिळाली होती परंतु आता च्या सरकारमध्ये त्यांना स्वतःची लायकी कळली आहे. तुम्ही आहे तिथे सुखी रहा. गद्दार म्हणून तिथे राहायचे असेल तर सुखी राहा परंतु थोडी जरी लायकी शिल्लक राहिली असेल तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे या. एकदा होऊन जाऊद्या ४० मतदार संघात पाहून घेऊ. ज्यांना शिवसेनेत परत यायचे आहे त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव उघडे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
उद्धव साहेबांनी जे वचन दिले ते त्यांनी पाळले. औरंगाबादचे नाव संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशीव करण्याचा आपला शेवटचा निर्णय होता. आपण सर्व चांगले निर्णय घेतले. शेतकरी, महिला आणि सर्व समाजाचा विचार केला. शिवसेनेला एकटे पाडण्याचा हा कट आहे. महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा हा कट आहे. आपल्याला सर्वांना एकत्र राहायचे आहे. शिवसेनेला पुढे न्यायचे आहे, असे ठाकरे म्हणाले.