मुंबई- राज्यात सत्तास्थापनेवरून सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लवकरात लवकर सरकार स्थापन होणार असल्याचे सांगितले आहे. ”सरकार स्थापनेचा पेच लवकरच सुटेल असं मला वाटतं, शेवटी सर्वांना महाराष्ट्राच्या हितासाठी काम करायचं आहे. महाराष्ट्रात सध्या शेतकऱ्यांवर मोठं संकट आहे. या संकटाच्या काळात नवीन सरकार लवकरात लवकर स्थापन झालं पाहिजे. कारण, काळीजावाहू सरकारला निर्णय घेण्यासाठी काही बंधनं असतात, सध्या जे निर्णय घेता येतात ते तर काळजीवाहू सरकार घेतच आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं हित पाहता लवकरात लवकर सरकारची स्थापना होईल अशी मला अपेक्षा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सांगितलं आहे.
अकोला जिल्ह्यातील पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची आज मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला. तसेच, अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली.
निवडणुकीच्या आणि दिवाळीच्या धामधुमीत राज्यात अवकाळी पावसानं थैमान घातलं. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणासह राज्याच्या अनेक भागात शेतकऱ्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. मका, कापूस, बाजरी, सोयाबीन, द्राक्ष यासह अनेक पिके भूईसपाट झाली आहेत. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागांचा दौरा करत आहेत.