मुंबई : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन कालपासून सुरू झालंय. शिंदे आणि फडणवीस सरकारचे हे पहिलेच अधिवेशन आहे यादरम्यान, ग्रामविकास आणि वैद्यकीय शिक्षण खात्याची धुरा सांभाळणाऱ्या गिरीश महाजनांकडून आकडेवारीत चूक झाली. यावरून भास्कर जाधव यांनी सभेत जोरदार टीका केली.
महाजनांकडून विधेयकाच क्रमांक चुकला अन् त्यावरून त्यांना टीकेला सामोरं जावं लागलं. “गिरीश महाजनसाहेब, तुमच्यासारख्या अनुभवी मंत्र्याकडून आकड्यांची गल्लत अपेक्षित नाहीये. त्यामुळे तुम्ही तरी किमान योग्य माहिती सभागृहात मांडावी, अशी अपेक्षा आहे”, असं भास्कर जाधव म्हणालेत. “हरकतीच्या मुद्याला काही महत्व आहे की नाही?” भास्कर जाधव यांनी महाजनांना सवाल विचारलाय.
नेमकं काय झालं?
विधानसभा अध्यक्षांनी विधेयक क्रमांक 16 मांडण्यास सांगितलं. पण महाजन यांनी विधेयक क्रमांक 17 सभागृहात मांडलं. त्यावर विरोधकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले. भास्कर जाधव यांनी महाजनांना काही प्रश्न विचारले. पण भास्करराव तुम्ही औचित्याचा मुद्दा उपस्थित केलाय. पण आपण आता पुढे गेलो आहोत, असं अध्यक्षांनी म्हटलं. त्यावर आम्ही हरकतीचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्याला काही महत्त्व नाही का? असंच कामकाज रेटणार आहात का?, असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय.विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभेच्या कामकाजावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरल्याचं पाहायला मिळालं. गिरीश महाजन यांनी सभागृह सोडून बाहेर गेले अन् परतल्यावर त्यांच्याकडून विधेयकाचा क्रमांक चुकला त्यावरून विरोधकांनी गदारोळ केला. गिरीष महाजन यांच्यासारख्या अनुभवी मंत्र्यांकडून अश्या चुकीची अपेक्षा नव्हती. त्यांची तयारी झालेली नव्हती का? असे प्रश्न विरोधकांकडून विचारण्यात आले.