
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अकोला जिल्ह्यात जाऊन परतीच्या पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. फडणवीस बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी बोलले आणि त्यांच्याकडून माहिती घेतली. यानंतर त्यांनी नुकसानावरील उपापययोजनांसाठी अधिकाऱ्यांसोबत तातडीने बैठक घेतली. परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. फोटो असेल तरी पंचनामे समजून मदत दिली जाईल. सरकारी यंत्रणा पोहोचू शकत नसेल तरी शेतकऱ्यांना यामुळे मदत मिळेल. तसंच ६ नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दुष्काळात मिळणाऱ्या सर्व योजनांद्वारे शेतकऱ्यांना मदत केली जाईल. विमा नसलेल्या शेतकऱ्यांनाही मदत देण्याचा प्रयत्न आहे. यासाठी सरकारी आणि खासगी विमा कंपन्यांशी सरकारची चर्चा सुरू आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.