मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यासह इतरांनी एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर इतर बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरील आक्षेपाची मुंबई जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी करताना समितीने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवत वानखेडे यांनी क्लिन चीट दिली.
समीर वानखेडे हे एनसीबीचे अधिकारी असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खान याला अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई बोगस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केला होता. मलिक यांनी वानखेडे यांच्याविरोधात आरोपांची जंत्रीच सादर करत त्यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यातच मलिक यांनी वानखेडे यांनी बोगस जात प्रमाणपत्राच्या आधारे सरकारी नोकरी मिळवली असल्याचा आरोप केला. या आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू असताना भीम आर्मी आणि स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने या वादात उडी घेतली. या दोन्ही संघटनांना मुंबई शहर जिल्हा जात पडताळणी समितीकडे वानखेडे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने काय म्हटले?
समीर वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावरील आक्षेपाची जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सुनावणी झाली. या प्रकरणाची सुनावणी करताना समितीने काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदवत वानखेडे यांनी क्लिन चीट दिली. समीर वानखेडे हे जन्माने मुस्लिम नसल्याचे या समितीने म्हटले. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हिंदू धर्माचा त्याग करून मुस्लिम धर्मामध्ये विधीवत धर्मांतर केले नसल्याचे समितीने म्हटले. समीर वानखेडे यांचे वाडवडील हे हिंदू धर्मीय अनुसूचित जातीतील असल्याचे सिद्ध होत असल्याचेही जातपडताळणी समितीने म्हटले. समीर वानखेडे यांच्याविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याने ही तक्रार फेटाळून लावण्यात येत असल्याचे जात पडताळणी समितीने म्हटले.