मुंबई : राज्यात पावसाचे पुनरागमन झाले असून पुढील 5 दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पण मुसळधार पाऊस बरसणार आहे. विजांच्या कडकडाटासह हा पाऊस असणार आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेषत: नदी काठच्या गावकऱ्यांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.कोकणातील रायगड, रत्नागिरी तर मुंबई पुण्यातही जोरदार पाऊस होणार आहे. पालघर, ठाणे, नाशिक, उस्मानाबाद, नांदेड, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे जनजीवन तर विस्कळीत होईलच पण खरीप हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.
घाटमाथ्यावर पावसाचे सातत्य
हंगामाच्या सुरवातीपासून घाटमाथ्यावर बरसणाऱ्या पावसामध्ये आताही सातत्या राहणार आहे. घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आणि कोकणात येत्या 5 दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागामध्ये तर पावसामध्ये सातत्य सुरुच आहे. यातच हवामान विभागाने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. धरणामध्ये सरासरीएवढा पाणीसाठा झाला असल्यास त्या ठिकाणच्या नद्यांना पूरस्थितीचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विदर्भात अतिवृष्टी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
ऑगस्ट महिन्यात सरासरीएवढा पाऊस पडेल असा अंदाज होता. पण दुसऱ्या आठवड्यातच निसर्गाने लहरीपणा दाखवण्यास सुरवात केली आहे. 10 दिवसांपासून गायब झालेला पाऊस पुन्हा सक्रीय होत आहे. विदर्भात 10 ऑगस्टपर्यंत तुरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस बरसणार असल्याचे सांगण्यात आले आहे तर 10 ऑगस्ट रोजी याच विभागात अतिवृष्टी होणार असल्याचाही अंदाज आहे.