मुंबई: सत्तेत समान वाटा आणि मुख्यमंत्रिपद या फॉर्म्युल्यावरून भाजप-शिवसेनेत संघर्ष सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या नेहमीच्या खुमासदार शैलीत दोन्ही पक्षांना जोरदार टोला लगावला आहे. भाजप-शिवसेनेची युती आहे. त्यामुळं सत्ता स्थापन करण्याची त्यांची जबाबदारी आहे. सोमवारी शिवसेनेचा, मंगळवारी भाजपचा मुख्यमंत्री करा आणि रविवारी आठवले साहेबांना मुख्यमंत्री करा, पण एकदाचं सरकार स्थापन करा, अशा शब्दांत आव्हाड यांनी शिवसेना-भाजपची खिल्ली उडवली आहे.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत जनतेनं भाजप-शिवसेनेला कौल दिला आहे. मात्र, आता समान वाटा आणि मुख्यमंत्रिपद या मुद्द्यांवरून भाजप-शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेनेच्या दुसर्या फळीतील नेत्यांमध्ये वाकयुद्ध सुरू आहे. या दोन पक्षांमध्ये सत्तेसाठी संघर्ष सुरू असतानाच, त्यात राष्ट्रवादी काँग्रेसनं उडी मारली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना भाजप-शिवसेनेची खिल्ली उडवली आहे. दोन्ही पक्ष मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीचे पाय ओढत आहेत. या नाट्यातून दोन्ही पक्षांचे चारित्र्य राज्यातील जनतेला कळले आहे. भाजप-शिवसेनेची युती झालेली आहे. त्यामुळे आता सत्ता स्थापन करण्याची जबाबदारीही या दोन्ही पक्षांची आहे, असे आव्हाड म्हणाले. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका विनोदाचा उल्लेख करत शिवसेना-भाजपला टोला लगावला आहे. सोमवारी शिवसेनेचा मुख्यमंत्री करा, तर मंगळवारी भाजपचा मुख्यमंत्री करा. तर रविवारी रामदास आठवले यांना मुख्यमंत्री करा, पण एकदाचं सरकार स्थापन करा, अशा शब्दांत त्यांनी खिल्ली उडवली. भाजप आणि शिवसेनेचे नेते राज्यातील जनतेला मूर्ख बनवत आहेत, अशी तोफही त्यांनी डागली.