मुंबई: सत्तास्थापनेच्या 50-50 फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे ठरले नसल्याचे खळबळजनक विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यापासून राज्यात महायुतीचे सरकार स्थापन करण्याची प्रक्रियेला खीळ बसली असून ती सोडवण्यासाठी लवकरच भारतीय जनता पक्षाचे हायकमांड शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार आहेत. ही माहिती भाजप नेते गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे. काहीही झाले तरी सरकार भाजप, शिवसेना आणि मित्रपक्षाचेच स्थापन होईल याचा पुनरुच्चारही महाजन यांनी केला आहे. भाजप आणि शिवसेनेमध्ये निर्माण झालेले वितुष्ट येत्या दोन-तीन दिवसांमध्ये संपुष्टात येईल असा विश्वासही महाजन यांनी व्यक्त केला.
आज भारतीय जनता पक्षाची बैठक होत असून या बैठकीच भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली जाणार आहे. या निवडीनंतर पक्षाचे दिल्लीतील हायकमांड पुढील रणनीती ठरवतील असे महाजन म्हणाले.
भारतीय जनता पक्षाचे हायकमांड उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे भाजप नेते गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. ही रणनीती ठरवण्याच्या प्रक्रियेत दिल्लीतील पक्षश्रेष्ठींसह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही सहभाग असणार आहे, असेही महाजन पुढे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे देखील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी सुरु असलेल्या पेचप्रसंग सोडवण्याच्या दृष्टीने चर्चा करणार असल्याचे गिरीश महाजन म्हणाले.