मुंबई : राज्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुंबई आणि लगतच्या भागात गेल्या २ दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला. ज्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं असून यामुळे नागरिकांना मोठा फटका बसला आहे. अशात भारतीय हवामान खात्याने बुधवारी मुंबईसाठी यलो अलर्ट तर ठाणे आणि पालघर व लगतच्या भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. इतकंच नाहीतर, समुद्राच्या पातळीत लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे लोकांना आज समुद्रापासून दूर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
आज दुपारी ४.३२ वाजता मुंबईत ३.९४ मीटर उंचीची भरती अपेक्षित आहे. तर १३ फुटांवर लाटा येण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई आणि लगतच्या भागात मंगळवारी मुसळधार पावसाने हजेरी लावली, ज्यामुळे रेल्वे ट्रॅकसह अनेक ठिकाणी पाणी साचले. रस्त्यावर गाड्यांची वाहतूक मंदावली तर यामुळे प्रवाशांनाही फटका बसला.
कुठे आहे पावसाचा इशारा?
रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, नाशिक या शहरांमध्ये ८ तारखेपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर आणि साताऱ्यामध्ये हवामान खात्याकडून मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून घाटामाथ्यावर पावसाचा जोर जास्त असेल असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या इतर भागांप्रमाणेच, राजापूर तालुका परिसरातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक पिके वाहून गेली आहेत. राजापूरचे अनेक भाग पुरामुळे पाण्याखाली गेले असून, पाऊस सुरू राहिल्यास स्थानिक बाजारपेठ पूर्णपणे पाण्याखाली जाण्याची भीती आहे.