मुंबई : मान्सून कोकणात दाखल झाला असून कोकणातील काही भागात मान्सूनला सुरूवात झाली आहे. त्यापूर्वी राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाने झोडपले. पावसाने हजेरी लावल्याने उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याने अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. इतकंच नाही तर पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, धुळे तर मराठवाडा विभागातील जालना, बीड, परभणी, औरंगाबाद, नांदेड या जिल्ह्यात तर विदर्भातील बुलढाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
मान्सून दक्षिण कोकणात वेंगुर्ल्यापर्यंत पोहोचला, तर महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये मान्सून पोहोचण्यासाठी पुढील दोन दिवस लागू शकतात आणि त्यापुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील आणखी काही भागांमध्ये मान्सून पोहोचेल, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. सर्वसाधारणपणे १० जूनला मुंबईमध्ये मान्सून दाखल होतो. स्कायमेट या खासगी संस्थेने मुंबईमध्ये पुढच्या आठवड्यात मान्सून सक्रिय होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.
हे पण वाचा :
सावधान ! देशात कोरोनाची चौथी लाट? 24 तासांत इतके रुग्ण आढळले
राज्यसभेच्या सहाव्या जागेवर भाजपच्या धनंजय महाडिकांचा विजय ; शिवसेना उमेदवाराचा पराभव
अखेर प्रतिक्षा संपली ; मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागाची माहिती
रेल्वेत नोकरीची संधी..10वी पाससाठी तब्बल 5000 हून अधिक जागा रिक्त
दरम्यान, पावसाळी हवामान आणि ढगाळ वातावरणामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढ-उतार होत आहे. विदर्भातील उष्ण लाट कमी झाली असली तरी उन्हाचा चटका कायम आहे. मागच्या 24 तासांमध्ये गोंदिया येथे राज्यातील उच्चांकी 44.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उर्वरित विदर्भासह राज्यातही उन्हाचा चटका कायम आहे. ढगाळ वातावरणामुळे अनेक जिल्ह्यात उकाडा जाणवत आहे.
मागच्या 24 तासात पुणे 35.3, धुळे 41.0, जळगाव 40.7, कोल्हापूर 33.6, महाबळेश्वर 25.6, नाशिक 36.3, निफाड 36.6, सांगली 34.8, सातारा 33.5, सोलापूर 35.2, सांताक्रूझ ३५.२, डहाणू 34.8, रत्नागिरी 32.6, औरंगाबाद 38.6, परभणी 34.7, नांदेड 41.0, अकोला 42.9, अमरावती 42.0, बुलडाणा 39.3, ब्रह्मपूरी 43.2, चंद्रपूर 42.0, गोंदिया 44.5, नागपूर 42.9, वाशीम 40.0, वर्धा 43.1, यवतमाळ 41.5 तापमानाची नोंद झाली.