मुंबई : राज्यात राज्यसभा निवडणुकीचा धुरळा उडाल्याचं पाहायला मिळत आहे.राज्यात 10 जून म्हणजेच, आज राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मतदान पार पडणार असून संध्याकाळी 5 पासून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात.
दरम्यान, सहाव्या जागेसाठी निवडणूक चुरशीची होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्रॉस व्होटिंगची किंवा मतं फुटण्याची भीती सर्वच राजकीय पक्षांना आहे. त्यामुळे शिवसेनेने आमदारांना व्हिप जारी केला आहे. प्रत्येक पक्ष खबरदारी घेताना दिसत आहे. त्यामुळेच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि भाजपनं आपापल्या आमदारांना मुंबईतील हॉटेलमध्ये ठेवलं आहे.
या निवडणुकीत विधानसभेचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी मतदार असतात विधानसभेचे 288 सदस्य आहेत. परंतु एका आमदाराचे निधन आणि 2 आमदार कोठडीत असल्याने एकूण 285 मतदार राज्यसभेच्या सहा जागांसाठी मतदान करणार आहेत.
सहा जागांसाठी 7 उमेदवार रिंगणात
विद्यमान संख्याबळानुसार राज्यात भाजपचे दोन आणि महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षाचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. मात्र तिन्ही पक्षातील उर्वरित मतांच्या जोरावर शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे संजय पवार यांना रिंगणात उतरवले आहे, तर भाजपनेही उर्वरित मतांच्या आणि अपक्षांच्या मतांवर दावा करत कोल्हापूरच्याच धनंजय महाडिक यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत अपक्ष उमेदवार आणि घटक पक्षांची भूमिका महत्वाची राहणार आहे.