- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेत सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील यांचा संताप अनावर
- जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवारांसमोर भाजपचे बंडखोर उमेदवार असल्याने ना.गुलाबराव पाटीलांची नाराजी
जळगाव – ग्रामीण मध्ये भाजपाचे बंडखोर उमेदवार चंद्रशेखर अत्तरदे आपली भाजपतील अधिकृत बंडखोरी असल्याचा प्रचार करत असून भाजपने त्यांचा प्रचारादरम्यान वापर करीत असल्याने गुलाबराव पाटील यांनी आज संताप व्यक्त केला. माझे काय चुकले असा जाब विचारत ना.गुलाबराव पाटलांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयोजित सभेत संताप अनावर झाल्याचे दिसून आले. तसे त्यांनी प्रसारमाध्यमांजवळ बोलूनही दाखवले. बंडखोरी करणार्या शेखर अत्तरदे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करू मोदींच्या सभेत आपल्याला भाषण करण्याची संधी मिळावी अशी विनंती पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे.
जिल्ह्यात शिवसेनेच्या उमेदवारांविरुद्ध भाजपचे बंडखोर उमेदवार उभे असल्याने त्यांच्यावरील कारवाईच्या मुद्यावरून जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांच्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभास्थळीच रविवारी खटके उडाले. याबाबत गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली.
जिल्ह्यात शिवसेनेचे चार उमेदवार रिंगणात आहेत. या चारही ठिकाणी भाजपचे चार बंडखोर उभे आहेत. याबद्दल आपणास पंतप्रधान मोदी यांच्यासमोर व्यथा मांडण्याची संधी मिळावी, असे गुलाबराव पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांना सांगितले, मात्र तसे करता येणार नाही, असे महाजन यांनी सांगितल्याने दोघांमध्ये सभास्थळीच जोरदार वाद झाला.
जिल्ह्यात शिवसेनेचे चार उमेदवार उभे आहेत. या चारही ठिकाणी भाजपचे बंडखोर उभे आहेत. त्यात जळगाव ग्रामीण मतदार संघात स्वत: गुलाबराव पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर चंद्रशेखर अत्तरदे, चोपड्यातील शिवसेनेच्या उमेदवार लता सोनवणे यांच्याविरुद्ध भाजपाचे जि.प.तील सभापती प्रभाकर सोनवणे, पाचोरा येथे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर अमोल शिंदे हे रिंगणात आहेत. तर पारोळ्यात शिवसेनेचे चिमणराव पाटील यांच्याविरुद्ध भाजपचे बंडखोर गोविंद शिरोळे हे रिंगणात आहेत. त्यामुळे या चारही ठिकाणी शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे उपनेते गुलाबराव पाटील यांनी थेट मोदी यांच्याकडेच व्यथा मांडण्याची परवानगी मागितली. त्यावरुन हा वाद झाल्याची माहिती आहे. दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, भाजपने बंडखोर उमेदवारांवर कारवाई करावी, असे पत्र स्वत: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे दिले आहे. तरीही कारवाई होत नाही. युतीसाठी हे योग्य नाही.