मुंबई: ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून भाजपकडून महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला जात असून अशातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी सरकारला इशारा दिला आहे. आघाडीला चेतावणी देतोय आता तरी सुधरा नाही तर तुम्हाला ओबीसी (obc) समाज सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला देवेंद्र फडणवीस संबोधित करत होते. यावेळी त्यांनी हा इशारा दिला.
येता काळ संघर्षाचा आहे. आज जर लढलो नाही तर आपले अधिकार कधीच मिळणार नाहीत. आज उभं राहिलो नाही तर कधीच उभं राहता येणार नाही. आज संघर्ष केला नाही तर संघर्षासारखं राहणार नाही. इतिहास एकदाच संधी देतो. ती संधी दिलीय संघर्ष करण्याची. संधीचं जो सोनं करतो तोच इतिहासात राहतो.
जेव्हा सत्ता आपल्या मानगुटीवर बसते, त्या सत्तेशी जो समझोता करतो तो कधीच इतिहास नोंदवू शकत नाही. सत्तेशी समझोता नाही तर संघर्ष करावा लागतो. ही संघर्षाची वेळ आज आली आहे. या जुल्मी सरकारच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी एक एक ओबीसी पेटून उठला पाहिजे. भाजप ताकदीने तुमच्या पाठी उभी राहिल, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.
काही वाटेल ते झालं आणि कोणतीही किंमत मोजावी लागली तरी ओबीसी आरक्षणाचा लढा लढला जाईल. जेवढ्या निवडणुका येतील त्यात आरक्षण असो की नसो. आम्ही ओबीसींना 27 टक्के आरक्षण देणार, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.