जळगाव : राज्यात वारंवार हवामानात मोठे बदल होत आहेत. आताही अनेक जिल्ह्यांमध्ये कडक उन्हाच्या झळा आहेत तर काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. येत्या दोन दिवसांत जळगाव जिल्ह्याचा कमाल तापमानाचा पारा ४५ अंशांवर जाण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून आलेली उष्णतेची लाट कायम आहे. गेल्या दीड महिन्यात विदर्भ-मध्य महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत तीन उष्णतेच्या लाटा येऊन गेल्या आहेत. काल सोमवारी तापमान ४४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले.
अद्याप मे महिना शिल्लक असून, उष्णतेची मोठी लाट येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात १६ मार्चपासून कमाल तापमान ४० अंशांवर कायम आहे. मार्च व एप्रिल या दोन्ही महिन्यांत आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान राहिले आहे. येत्या चार दिवसांत जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार आहे. यंदा मागील शंभर वर्षांतील सर्वात उष्ण लाटा अनुभवास येत असून, मे महिन्यात उष्णतेचा तडाखा अधिक असेल.
हवामान खात्याचा अंदाज
दिनांक- तापमान अंश सेल्सिअस
२६ एप्रिल – ४४
२७ एप्रिल – ४५
२८ एप्रिल – ४५
२९ एप्रिल – ४४
३० एप्रिल – ४३