जळगाव : लग्नाच्या बस्त्यासाठी चाळीसगावहून यवतमाळकडे जाताना कारला खासगी बसने समाेरून जोरदार धडक दिल्याने चाळीसगावातील भावी नवरदेवासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना बुलडाण्यातील मेहकर शहराजवळ मुंबई-नागपूर महामार्गावर घडली. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. एकाच दिवशी एकाच ठिकाणी मोठ्या व मधल्या भावांचा मृत्यू झाल्याचे ऐकून कुटुंबासह गावकरी हादरले.
याबाबत असे की, योगेश विनायक विसपुते (३५) यांचा विवाह यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील मुलीशी ठरला होता. हा विवाह सोहळा १८ मे रोजी होणार होता. यामुळे विसपुते कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. शनिवारी पहाटे विसपुते कुटुंब कारने चाळीसगाव येथून मित्र आणि नातेवाइकांना घेऊन साखरपुड्यासाठी जात होते. मात्र, मेहकर नजीक त्यांचे वाहन पोहोचले असता काळाने घाला घातला.
बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर येथून जाणाऱ्या मुंबई-नागपूर महामार्गावरील खामखेड फाटानजीक खाजगी ट्रॅव्हल्स आणि त्यांच्या कारमध्ये भीषण अपघात झाला. समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात योगेश विनायक विसपुते (३५), विलास विनायक विसपुते (३२) व इंदल चव्हाण (३८) या तिघांचा मृत्यू झाला. तर मिथून रमेश चव्हाण व ज्ञानेश्वर रंगनाथ चव्हाण हे गंभीर जखमी झाले. जखमींवर प्रथम उपजिल्हा रुग्णालय व नंतर बुलडाणा येथील सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आला. धडक इतकी भीषण होती की कारचा चुराडा झाला.
एकाच कुटुंबातील दोन कर्त्या व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे आई व सर्वांत लहान भाऊ नीलेश विसपुते यांना जबर धक्का बसला आहे. दोघे भाऊ व गाडीतील इतर तिघे हे चाळीसगाव येथील पाटील पेट्रोलपंपावर काम करीत होते. अपघाताची माहिती मिळताच सर्वत्र शोककळा पसरली. नातेवाईक उपजिल्हा रुग्णालयात आक्रोश करीत होते. मृतांचे स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी लक्झरी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.