मुंबई : एकीकडे उन्हाचा हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना आता लोडशेडिंगचा पुन्हा त्रास सोसावा लागतोय. दिवसातून चार ते सहा तास वीज पुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. पण भारनियमन सुरू झाले जाहीरपणे सांगण्यात आले नव्हते. आता ऊर्जामंत्र्यांनीच भारनियमन सुरू असल्याची कबुली दिली आहे. होय, राज्यात विजेचे भारनियमन सुरू झाले आहे’, अशी थेट कबुली ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.
राज्यात तब्बल १४ हजार मेगावॉट विजेची तूट आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी अनेक तास विजे पुरवठा बंद आहे. केंद्रीय प्रकल्पांमधून ७६० ऐवजी ६३० मेगावॉटच वीज दिली जात आहे. त्यामुळे भारनियमन होत आहे’, असे ते म्हणाले. महानिर्मितीला केंद्र सरकारकडून कोळसा मिळत नसल्याचेही डॉ. राऊत म्हणाले. ‘सप्टेंबर महिन्यापासूनच कोळसा पुरवठ्यात अडथळे येतात. कोळसा आणण्यासाठी रेल्वे आम्हाला वॅगन देत नाही. त्याचा फटका बसत असून यामुळेच कोळसाआधारित वीज निर्मितीत अडथळा येत आहे’, असेही ते म्हणाले.
‘राज्यातील वीज उपलब्धतेची सद्यस्थिती पाहता भारनियमन कधीपर्यंत असेल, हे सांगता येणार नाही’, असे धक्कादायक वक्तव्य ऊर्जा मंत्र्यांनी यावेळी केले. ‘कोळसा टंचाई व बाजारातही खरेदीसाठी वीज उपलब्ध नसल्याने भारनियमनाचा कालावधी सांगता येणार नाही. ग्राहकांनी विजेची काटकसर करावी’, असे ते म्हणाले.