जळगाव : मागील गेल्या काही काळापासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दरम्यान, अशातच जळगाव दौऱ्यावर आलेले राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यासोबतच पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या छापेमारीबाबत भाष्य केलं.
पत्रकारांशी बोलताना महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये छापेमारी का केली जाते, यावर सविस्तर उत्तर दिलंय. भाजपचा सत्ता मिळवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांकडून कारवायांचा वापर केला जात असल्याचा आरोपच यावेळी शरद पवार यांनी केलाय. जिथं जिथं भाजपची सत्ता नाही, तिथं तिथं केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया वाढलेल्या आहेत, असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.
राज्यात गेल्या काही काळापासून केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया वाढल्याचं पाहायला मिळतंय. यावरुन केंद्र विरुद्ध राज्य अशा संघर्ष पेटलेला आहे. त्यावरुच संजय राऊत यांनीही पत्र लिहून आपलं म्हणणं मांडलं होतं. दरम्यान, सत्ता मिळवण्यासाठीच महाराष्ट्र आणि बंगालमध्ये छापेमारी केली जात असल्याचा गंभीर आरोप शरद पवारांनी जळगावात बोलताना केलाय.