जळगाव : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनी भाजपवर जोरदार फटकेबाजी केली. खडसेंनी भाजपचे व विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला आहे. तसेच ‘सत्ता नसल्याने गुदमरत असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी आता मी पुन्हा येईन हे विसरुन जावे’, असा टोलाही खडसे यांनी लगावला आहे. ते जळगावात बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे १५ एप्रिल रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्याच्या नियोजनार्थ तसेच विविध बाबींवर चर्चा करण्यासाठी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी भाषणात एकनाथ खडसेंनी जोरदार फटकेबाजी केली. अनेक चुकीच्या लोकांना हाताशी धरुन भाजपकडून सरकारला पाडण्याचा प्रयत्न झाला. मला तर बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे शरद पवारांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ४० वर्षाच्या राजकारणात पहिल्यांदाच एवढे घाणेरडे राजकारण मी अनुभवत आहे.
सत्ता नसल्याने देवेंद्र फडणवीस यांचा जीव गुदमरत आहे. मात्र, कुणाही काहीही म्हणत असले तरी, कावळ्याच्या शापाने गाई मरत नाहीत, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. पुढचेही वर्ष यशस्वीपणे हे सरकार पार पाडेल. पाच वर्षांचा कार्यकाळही पूर्ण करेल. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मी पुन्हा मुख्यमंत्री होईन, मी पुन्हा येईन हे कायमचेच विसरुन जावे, घाणेरडे राजकारण करणाऱ्या भाजपाला जनतेने नाकारले आहे. असाही टोला एकनाथ खडसे यांनी लगावला.