मुंबई : शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुन्हा किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस व भाजपवर निशाणा साधला आहे. “एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा देण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे. जे स्वत: शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात त्याचं पितळ उघड पडलं आहे. विक्रांतचा घोटाळा हा झालेलाच आहे,” असे राऊत यांनी टीका करताना म्हंटले आहे.
भाजप आणि किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावरून सध्या महाविकास आघाडी सरकार मधील नेत्यांकडून निशाणा साधला जात आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. दरम्यान आज पुन्हा राऊत यांनी सोमय्यांवर हल्लाबोल करीत भाजपला टार्गेट केले आहे.
यावेळी संजय राऊत यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादनही केले. यावेळी ते म्हणाले की, आज आंबेडकरांची जयंती आहे. आज ये जर असते तर त्यांनीही अश्रू ढाळले असते. आरोपीने कोणत्या परिस्थितीत जामीन मिळवला याबद्दल लोकांच्या मनात संशय आहे. न्यायव्यवस्थेत एका विचारांचे लोक आहेत हे स्पष्ट दिसत आहे. घोटाळा 58 रुपयांचा असेल किंवा 58 कोटींचा असेल. अपहार हा अपहारच असतो असे यावेळी राऊत यांनी म्हंटले.