पुणे : एकीकडे राज्यात उन्हाचा चटका वाढला असून त्यात दुसरीकडे राज्यातील विविध भागात पुढील दोन दिवस अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विदर्भ, मराठवाडा ते कर्नाटक या भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात आगामी दोन दिवसात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे.
अवकाळीची अवकृपा ही कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्येच अधिक झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे केवळ 40 टक्के आंबा फळपिक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे. आता तिसऱ्या हंगामातील आंबा झाडावर आहे. 15 एप्रिलपासून याची तोड होणार असे सांगितले जात होते पण अवकाळी पावसामुळे पुन्हा फळगळती सुरु झाली आहे. फळगळतीमुळे उत्पादनावर तर परिणाम झालाच आहे पडलेला आंबाही डागाळत आहे. त्यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांना ना अपेक्षित उत्पादन पदरी पडलेले आहे ना दर. यंदाचा हंगाम नुकसानीचाच ठरत आहे.
कोकणासह मध्य महाराष्ट्रात धोका कायम
मध्य महाराष्ट्रासह कोकणातील काही भागात पावसासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अणखी दोन दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये तुरळक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस बरसणार आहे. 13 एप्रिलपर्यंत अशीच स्थिती राहणार आहे. तर 14 एप्रिलपासून हवामान कोरडे आणि आकाश हे निरभ्र राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रत्नागिरीमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तापमानात काही अंशी घट झाली आहे.
मराठवाड्यातही ढगाळ वातावरण
मराठवाड्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. सुरवातीला औरंगाबादसह जिल्ह्यात तर आता उर्वरित भागात पावसाने हजेरी लावलेली आहे. सोमवारी उस्मानाबाद, लातूर, परभणी जिल्ह्यात अवकाळीची अवकृपा झाली तर अद्यापही ढगाळ वातावरण कायम आहे. मराठवाड्यात जरा उशिराने पावसाला सुरवात झाल्याने रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळाले आहे. सध्या ज्वारी, गहू, हरभरा या मुख्य पिकांची काढणी कामे अंतिम टप्प्यात आहेत. मात्र, कोकणासह उत्तर महाराष्ट्रातील फळपिकांना अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला आहे.