मुंबई : राज्यातील करोनाचे सर्व निर्बंध मागे घेण्यात आले आहेत. मुंबई लोकलवरीलही (Mumbai Local) सर्व निर्बंध हटवण्यात आले असून आता सर्व नागरिक लोकलमधून प्रवास करु शकणार आहेत.
करोना संसर्गाच्या वाढत्या प्रभावामुळं मुंबई लोकलमधून प्रवासावर मर्यादा आल्या होत्या. करोना लसीचे दोन डोस घेतलेल्यानाच लोकलप्रवासाची मुभा होती. मात्र, २ एप्रिलपासून राज्य सरकारने राज्यातील निर्बंध हटवण्यात आले. राज्य सरकारनं निर्बंध हटवल्यामुळे लस घेतल्याचं प्रमाणपत्र तिकीट अॅपशी लिंक करण्याची गरज नसल्याचं सांगण्यात आलं आहे. राज्य सरकारनं निर्बंध उठवण्याच्या निर्देशांनुसार, रेल्वेनंही सर्व कोविडसंदर्भातले निर्बंध उठवले आहेत.
रेल्वेने सर्व निर्बंध उठवले आहेत आणि मुंबईतील रेल्वेसाठी काउंटरवर आणि अॅपवर सर्वांसाठी तिकीट सुविधा सुरू केली आहे. याचा अर्थ प्रवाशांना आता त्यांची लस प्रमाणपत्रे तिकीट अॅपशी लिंक करण्याची आवश्यकता नाही. यासंबंधित सर्व सूचना आता मागे घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
सर्व अधिकृत प्रवेश-एक्झिट गेट्स, लिफ्ट्स, एस्केलेटर, करोना महामारीच्या काळात बंद केलेले फूट ओव्हरब्रिज, सर्व व्यावसायिक तिकीट काउंटर आणि बुकिंगसाठी एटीव्हीएम मशीन आता पुन्हा सुरू केल्या जातील, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.