जळगाव : राज्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून आजपासून राज्यात 31 तारखेपर्यंत उष्णतेची लाट असणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. विदर्भ, खान्देश आणि मराठवाड्यात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे विदर्भ, मराठवाड्यातल्या काही शहरांचा पारा तर 43 अंशांपार गेला आहे. तर जळगाव जिल्ह्यातील पारा ४२ अंशावर गेला आहे. दरम्यान, दुपारच्या वेळेत अतीनील किरणांची तीव्रता अधिक असल्यानं पुढील तीन चार दिवस दुपारच्या उन्हात जाणं टाळण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
काल (सोमवार) सलग सहाव्या दिवशी अकोल्यात राज्यातील सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. आज अकोल्यात कमाल तापमानाचा पारा 42.9 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याचं पाहायला मिळालं. 14 मार्चनंतर विदर्भात (Vidarbha) सूर्यनारायण तापला, अकोला आणि चंद्रपुरात सर्वोच्च तापमानाची नोंद करण्यात आली. 23 मार्च ते 28 मार्चपर्यंत अकोल्यातील तापमान सर्वाधिक असल्याची भारतीय हवामान खात्याची नोंद करण्यात आली. वायव्येकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे पश्चिम विदर्भात मागील काही दिवसांत सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. राजस्थानमधून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे विदर्भातील तापमानात मोठे बदल होणार असून अनेक जिल्ह्यात उष्मघाताची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
29 मार्च रोजी पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला आणि बुलढाण्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 30 मार्च रोजी खान्देशातील जळगाव, मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, तर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोलीत उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्यामुळे या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. संपूर्ण पश्चिम विदर्भात तापमान सरासरीच्या 4.5 अंश ते 6.4 अंश सेल्सिअस वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 31 मार्च रोजी देखील राज्यात जैसे थे परिस्थिती कायम राहणार आहे. चंद्रपुरात तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.